माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व कृतज्ञता सोहळा संपन्न २३ वर्षांपूर्वीचा जुन्या आठवणींना उजाळा

मावळ मराठा न्युज – पुणे जनता शिक्षण संस्था, पुणे – १२ अंतर्गत श्री शिवाजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, औंध येथे दिनांक रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी १० वी (सन २००२–२००३ ) बॅचचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा व कृतज्ञता सोहळा अत्यंत उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.या कार्यक्रमाला विद्यमान प्राचार्य श्री नवले रवींद्रनाथ शिवराम, उपप्राचार्य श्री चव्हाण विठ्ठल नारायण, पर्यवेक्षिका सौ. स्वाती देशमुख, माजी प्राचार्य श्री जकाते जे. बी. (२००३ बॅच), तसेच जनता शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व माजी प्राचार्य श्री नंदकुमार पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात स्वागत कन्यांकडून गुलाबपुष्पांनी स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, शिववंदना, सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला पारंपरिक सुरुवात झाली. स्वागत गीत, प्रभावी सूत्रसंचालन आणि शिक्षकांचे मार्गदर्शनपर मनोगत यामुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला. तसेच दिवंगत शिक्षक व विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून सर्वांनी भावपूर्ण स्मरण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संगीता मनाळे,ज्योती गडेराव आणि माधुरी वायदंडे यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. स्वागत गीत संदीप गुरव, रुक्मिणी सुर्वे आणि ज्योती भोसले यांनी सादर केले. माजी विद्यार्थी मनोगत adv. राहुल ढाले, स्वाती घायाळ आणि नेहा गोळे यांनी व्यक्त केले, तर शिक्षकीय मनोगत स्नेहलता जगताप मॅडम यांनी मांडले. अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नवले सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी सहयोगी प्राध्यापक डॉ. मल्हारी नागटिळक यांनी केले.या मेळाव्यात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पर्यावरणपूरक कुबेर (Crassula) रोप देऊन करण्यात आला. या माध्यमातून निसर्गप्रेम व सामाजिक संदेश देण्याचा सुंदर प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विविध कमिटींच्या नियोजनामुळे मंडप, सजावट, छायाचित्रण, भोजन व्यवस्था, नोंदणी, स्वागत इत्यादी सर्व बाबी अत्यंत सुयोग्य पद्धतीने पार पडल्या.विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी अनेक माजी विद्यार्थी दूरवरून—चिपळूण, नाशिक, सासवड, बारामती, मुंबई आदी ठिकाणांहून आवर्जून उपस्थित राहिले. एकूण सुमारे १२० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, ज्यामध्ये ४० ते ५० मुलींचा सहभाग लक्षणीय ठरला. २३ वर्षांनंतर एवढ्या मोठ्या संख्येने माजी विद्यार्थी एकत्र येणे ही अभिमानाची बाब ठरली.कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे—सर्व विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून महिलांचा सन्मान राखला, ज्यामुळे कार्यक्रमात स्नेह, आदर आणि सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. भोजन व्यवस्थाही उत्कृष्ट होती आणि सर्वांनी त्याचा मनसोक्त आनंद घेतला.या मेळाव्याच्या निमित्ताने २००२ –२००३ बॅचच्या विद्यार्थ्यांनी शाळेला सुमारे ५० ,००० रुपये किमतीचा लेझर प्रिंटर, स्कॅनर व झेरॉक्स मशीन भेट दिले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसत होता. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाचे मनापासून कौतुक झाले. हा स्नेह मेळावा केवळ एक कार्यक्रम न राहता—जुन्या आठवणींना उजाळा देणारा, मैत्रीचे बंध पुन्हा दृढ करणारा आणि कृतज्ञता व्यक्त करणारा एक अविस्मरणीय सोहळा ठरला

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page