“मानवकल्याणाच्या गोष्टी भारतीय म्हणून स्वीकारा!” – भन्ते राजरत्न

मावळ मराठा न्यूज़ :- पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : १० ऑक्टोबर २०२३) “धार्मिक तेढ टाळून धर्मग्रंथांमध्ये नमूद केलेल्या मानवकल्याणाच्या गोष्टी भारतीय म्हणून स्वीकारा!” असे विचार भन्ते राजरत्न यांनी आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे सोमवार, दिनांक ०९ ऑक्टोबर २०२३ रोजी व्यक्त केले. डॉ. अशोक शीलवंत यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिक बाबा भारती अनुवादित ‘धम्मपद’ या ग्रंथाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन भन्ते राजरत्न यांच्या हस्ते करण्यात आले. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, आचार्य रतनलाल सोनग्रा, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) कार्यवाह उद्घव कानडे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, माजी नगरसेविका डॉ. सुलक्षणा शीलवंत – धर, माजी नगरसेवक तुषार कामठे, मारुती भापकर, इंद्रायणी शिक्षण संस्था सचिव चंद्रकांत शेटे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, भाऊसाहेब डोळस, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, संजय आवटे, महेंद्र भारती यांची व्यासपीठावर तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.याप्रसंगी श्रीनिवास पाटील यांनी लोकसाहित्यातील विविध संदर्भ उद्धृत करीत काव्यमय शैलीतून अशोक शीलवंत यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. जयंत पाटील यांनी, “हिंसेचे क्रौर्य रूप पाहून आम्ही शिक्षणाचे संस्कार रुजविण्यात कमी पडलो!” अशी खंत व्यक्त केली; तर संजय आवटे यांनी, “बुद्धाच्या वाटेवर जाण्याशिवाय पर्याय नाही. सद्य:स्थितीत साहित्यिकांनी आपली स्वतःची भूमिका घेणे खूप महत्त्वाचे आहे!” असे मत मांडले. ज्ञान, कारुण्य, दया अन् प्रेमाचे प्रतीक म्हणजे तथागत गौतम बुद्ध होत.‌ संपूर्ण विश्वातील मानवजातीच्या कल्याणाचा काव्यमय बुद्धविचार ‘धम्मपद’ या ग्रंथात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेले त्यांचे समकालीन साहित्यिक आणि मराठी – पाली शब्दकोशकार बाबा भारती यांनी मूळ पाली भाषेत असलेल्या ४२३ धम्मपदांचा मराठीत अनुवाद केला. तत्त्वज्ञान विषयावरील या मौलिक ग्रंथाला महाराष्ट्र शासनाने संदर्भग्रंथ म्हणून स्वीकृती दिली. त्यामुळे साहजिकच अनुक्रमे १९७८ आणि २०१५ या वर्षी दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या; आणि लोकाग्रहास्तव तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन संपन्न झाले. डॉ. सुलक्षणा शीलवंत – धर यांनी प्रास्ताविक केले. अशोक सर्वांगीण विकास सोसायटीचे कार्याध्यक्ष ॲड. राजरत्न शीलवंत आणि पदाधिकारी यांनी संयोजन केले. प्रा. दिलीप कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र भारती यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page