यशस्वी होण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नाही – आयपीएस सत्य साई कार्तिक


मावळ मराठा न्यूज़ ,लोणावळा : ज्यांना खऱ्या अर्थाने आयुष्यात पुढे जायचे आहे, त्यांनी रात्र दिवस कष्ट घेतले पाहिजे. तुमचे जेवढे कष्ट जास्त असतील तेवढेच त्याचे फळही मोठे असेल. आयुष्यात मेहनतीशिवाय पर्याय नाही. असे मत आयपीएस अधिकारी सत्य साई कार्तिक यांनी व्यक्त केले. निमित्त होते लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या ४२ व्या वर्धापदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यापीठावर मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचलिका डॉ. मुक्ता पुनतांबेकर, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष मा. रमेशचंद्र नय्यर, सचिव मा. दत्तात्रय पाळेकर, कायदेशीर सल्लागार आणि विश्वस्त ॲड. नीलिमाताई खिरे,विश्वस्त दतात्रय येवले, सिडीसी सदस्य ॲड. अजय भोईर, मा. सुनील ठोंबरे, मा. विशाल पाडाळे, श्रीमती शैलजा फासे ,सौ.ब्रिदा गणात्रा,युवा युद्योजक राहूल पाळेकर,मुस्लिम बॕकेचे संचालक जाकीर खलिफा,प्रभारी प्रचार्य विलास पाटील उपस्थित होते.सत्य साई कार्तिक म्हणाले, ‘ मी सुरुवातीला कॉम्प्युटर इंजिअरींग केले. सहा महिने जॉब केल्यानंतर तिथे रमलो नाही. कारण मी लहान पणापासून क्रिकेट खेळत होतो. त्यामुळे एका जागी लॅपटॉप समोर बसून मला जमत नव्हते. मल्टीनॅशनल कंपनीतील काम सोडल्यावर वडिलांच्या सांगण्यावरून मी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. मी रोज सकाळी ६.३० ते रात्री १२ पर्यंत अभ्यास केल्यामुळे चौथ्या वेळेस मी देशात १०३ व्या रँकने उत्तीर्ण झालो. आणि आयपीएस अधिकारी झालो. जिद्द, चिकाटी आणि कष्टाशिवाय आयुष्यात पर्याय नाही.‘डॉ. मुक्ता पुनतांबेकर म्हणाल्या, ‘ माणूस वाईट नसतो त्याचे व्यसन वाईट असते. व्यसन केल्याने आनंद मिळतो आणि टेन्शन जाते हा जो गैरसमज झालेला आहे, तो प्रथम दूर केला पाहिजे. व्यसनाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे वर्तनाचे आणि दुसरे अम्ली पदार्थांचे. यातील वर्तनाचे व्यसन हे अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात दिसू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे मोबाईल आणि इंटनेटच्या जाळ्यात अडकत चाललेली आजची तरुणाई. त्यामुळे कोणतेही व्यसन हे वाईटच असते. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा घातकच असतो. विद्यार्थ्यांनी या गोष्टींपासून स्वतःला जेवढे दूर ठेवता येईल तेवढे ठेऊन आपले ध्येय गाठले पाहिजे.सचिव दत्तात्रय पाळेकर म्हणाले, या संस्थेचा आज ४२ व्या वर्धापन दिन साजरा करत असताना या संस्थेचा इतिहास खूप महत्वाचा आहे. हि संस्था बावीस विद्यार्थ्यांना बरोबर सुरू झाली होती. आज या संस्थेत दीड ते दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेला अजून प्रगतीपथावर नेण्यासाठी आम्ही सर्वजण तत्पर आहोत. अध्यक्षीय मनोगतात रमेशचंद्र नय्यर म्हणाले, ‘ या संस्थेचा वटवृक्ष होताना पाहतोय याचा आनंद आहे. या संस्थेसाठी ज्या ज्या गोष्टी करता येईल त्या त्या गोष्टी आम्ही करायला तयार आहोत. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयातील गुणवंत प्राध्यापक डॉ .सुपोर्णा मित्रा,प्रा.दीपक तारे व वरिष्ठ लिपीक बाळासाहेब सातकर यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. दीपक तारे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. संजय साळुंखे आणि प्रा. भक्ती अहेर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




