“विडंबनासाठी मूळ साहित्यकृतीचे आकलन आवश्यक!” प्रा. तुकाराम पाटील

मावळ मराठा न्युज :-पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : २६ मार्च २०२४ “अस्सल विडंबनासाठी मूळ साहित्यकृतीचे आकलन आवश्यक असते. त्यामुळे बौद्धिक रंजनाचा आनंद द्विगुणित होतो!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत येथे सोमवार, दिनांक २५ मार्च २०२४ रोजी व्यक्त केले. होलिकोत्सव आणि धूलिवंदनाचे औचित्य साधून नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ – प्राधिकरण आणि तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ – रावेत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रंगात रंगुनी साऱ्या… ‘ या विनोदी आणि विडंबनात्मक काव्यमैफलीचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. तुकाराम पाटील बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर भोंडवे, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, सचिव माधुरी ओक, तीर्थस्वरूप नागरिक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष दिलीप शिंदे, सचिव शिरीष कुंभार आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी शहरातील ४० साहित्यिकांच्या लेखनाचा समावेश असलेल्या ‘जीवनसंध्या – २०२४’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कृत्रिम रंगांचा वापर टाळून उपस्थितांवर रंगबिरंगी फुलांची उधळण करून पर्यावरणपूरक धूलिवंदनाचा उत्सव साजरा करण्यात आला. मोरेश्वर भोंडवे यांनी आपल्या मनोगतातून, “कष्ट आणि सातत्य असल्याशिवाय समाजमान्यता मिळत नाही. साहित्यिक आणि ज्येष्ठ नागरिक समाजाला दिशा देण्याचे काम करत असतात, त्यामुळे अशा गुरुजनांचा सन्मान समाजात व्हायला हवा!” असे विचार मांडले. नवयुगचे उपाध्यक्ष राजेंद्र घावटे यांनी प्रास्ताविकातून मंडळाच्या ३२ वर्षांच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘रंगात रंगुनी साऱ्या…’ या काव्यमैफलीत बाबू डिसोझा, सुनंदा शिंगनाथ, आनंद मुळूक, राजश्री मराठे, सुप्रिया लिमये, राजेंद्र पगारे, सुहास घुमरे, दिलीप क्षीरसागर, अण्णा जोगदंड, योगिता कोठेकर, शोभा जोशी, रघुनाथ पाटील, माधुरी डिसोझा, अरुण कांबळे, प्रल्हाद दुधाळ, अतुल क्षीरसागर, प्रतिमा काळे, आदींनी विनोदी आणि विडंबनात्मक कवितांचे सादरीकरण करीत हास्यरसाचा परिपोष केला. ‘जीवनसंध्या – २०२४’ मधील लेखनाप्रीत्यर्थ रजनी अहेरराव, माधुरी विधाटे, सीमा गांधी, प्रज्ञा घोडके, प्रदीप पाटील, रमेश वाकनीस, सुभाष चव्हाण, वंदना इन्नानी, नेहा कुलकर्णी, नंदकुमार मुरडे, प्रदीप गांधलीकर, पल्लवी चांदोरकर इत्यादी साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. अश्विनी कुलकर्णी, शरद काणेकर, अनिकेत गुहे, अरविंद वाडकर, चंद्रकांत कुलकर्णी, रमेश माने, नंदकिशोर बडगुजर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. संपत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. पी. बी. शिंदे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page