मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ आयोजित राज्यव्यापी वृत्तबद्ध काव्य महोत्सव तळेगाव दाभाडे संपन्न



मावळ मराठा न्यूज:- तळेगांव :- मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने मराठी साहित्य उत्कर्ष मंडळातर्फे आयिजित केला गेलेला राज्यव्यापी वृत्तबद्ध काव्य महोत्सव तळेगाव दाभाडे येथे पार पडला. मराठी साहित्य उत्कर्ष मंडळाचे मुख्य विश्वस्त श्री. सुरेश साखवळकर सर आणि संस्थापक प्रा. श्री. जयंत जोर्वेकर सर, अध्यक्षा सौ. कांचन सावंत, स्पर्धाप्रमुख निवृत्त ए.सी.पी. श्री. मोहन जाधव तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकारी समितीच्या सदस्यांच्या एकत्रित योगदानामुळे काव्यसोहळा अतिशय नेटकेपणाने साजरा झाला. डॉ. विनया केसकर, सौ. कांचन सावंत, सौ. रश्मी थोरात आणि कु. तेजस्विनी गांधी यांनी सोहळ्याच्या विविध सत्रांमध्ये अत्युत्कृष्ट सूत्रसंचालन केले. मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिलअण्णा शेळके यांनी सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आणि वृत्तबद्ध कवितेचा आगळावेगळा राज्यव्यापी महोत्सव तळेगावात साजरा होतोय ह्याबद्दल आनंद व्यक्त केला. सुरेश साखवळकर यांनी विविध वृत्तात रचलेल्या मराठी काव्यातील काही पदे सादर करून वृत्तबद्ध काव्याच्या समृद्धतेची ओळख उपस्थित रसिकवर्गाला करून दिली. दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये वृत्तबद्ध कवितेची ‘व्याप्ती आणि मर्यादा’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले गेले. चर्चासत्राचे समन्वयन पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध मराठी कवी श्री. संतोष वाटपाडे,नाशिक यांनी केले. चर्चासत्रात डॉ. अमित खातू, संजय गोरडे, अनिल अठलेकर आणि योगेश वैद्य या मान्यवर कवींचा सहभाग होता. मराठी कवितेचा शतकभरातील प्रवास, तिचे बदलते प्रारूप याबरोबरच वृत्तबद्ध कवितेच्या संदर्भातील साधक बाधक विचारांचा योग्य परामर्ष ह्या चर्चेत घेतला गेला. निमंत्रीतांच्या आणि संस्थेतील कवींच्या कवितांचे सादरीकरण तीन सत्रांमधून केले गेले. ज्याला रसिकांची दाद मिळाली. मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ यापुढेही मराठी साहित्याच्या प्रांगणातील विविध साहित्य प्रारूपांचे सोहळे साजरे करत राहून तळेगावातील मराठी साहित्यिक परंपरेच्या संवर्धनाच्या कार्यात अग्रेसर राहील असे विचार मंडळाचे संस्थापक मॉडर्न कॉलेजचे माजी उपप्राचार्य सेवानिवृत्त प्राध्यापक श्री. जयंत जोर्वेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये मांडले.




