“शहरी समाज लोकसाहित्यापासून वंचित!” -नरेंद्र पेंडसे

मावळ मराठा न्युज :-पिंपरी (प्रदीप गांधलीकर) दिनांक : २६ डिसेंबर २०२३,”नारदीय भक्तिसूत्र असो की थालगाणे, अशा अनेक परंपरा आणि लोकगीते, लोककथांच्या माध्यमातून साहित्य तळागाळातील लोकांपर्यंत झिरपत गेले आणि आजही टिकून आहे; पण त्यामानाने अशा लोकसाहित्यापासून शहरी समाज वंचित राहिला आहे!” असे विचार समरसता गतीविधीचे समन्वयक नरेंद्र पेंडसे यांनी सोमवार, दिनांक २५ डिसेंबर २०२३ रोजी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले. समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या ‘साहित्यसंवाद’ या उपक्रमांतर्गत आयोजित युवासंमेलनात ते बोलत होते. यावेळी समरसता साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखेच्या वतीने नवोदित आणि युवा कवींसाठी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार प्रदीप तळेकर होते; तर नरेंद्र पेंडसे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी मातंग ऋषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि बंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मधुश्री ओव्हाळ यांची निवड झाल्याबद्दल अनुक्रमे अरविंद दोडे आणि शोभा जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कविसंमेलनात ईश्वरी हातोळकर, आदेश कोळेकर, आत्माराम हारे, वेदान्ती घुमरे, नयन गोवंडे, रूपाली हंबर्डे, सुप्रिया लिमये, वैशाली मराठे, राजेंद्र भागवत, अशोक वाघमारे, नीलेश शेंबेकर, रघुनाथ पाटील, दीपाली पवार, श्रावणी भिसे, अनुशा पवार, मीना पवार, फरीदा अंसारी, भारती काळे, सुरेश जोशी आदींनी आपल्या कविता सादर केल्या. जयश्री श्रीखंडे, कैलास भैरट, बाळासाहेब सुबंध, अशोक महाराज गोरे यांनी संयोजनात मदत केली. शाखेच्या अध्यक्ष उज्ज्वला केळकर यांनी प्रास्ताविक केले. सुहास घुमरे यांनी सूत्रसंचालन केले; तर मानसी चिटणीस यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page