वैभव जोशी यांच्या मुलाखतरुपी सुवर्ण काव्याने कलापिनी मध्ये बहार आली


मावळ मराठा न्युज :-तळेगाव (हर्षल आल्पे)कवि , गीतकार तसेच लेखक वैभव जोशी यांची प्रकट मुलाखत कलापिनीच्या नाट्यसंकुलात पार पडली … निमित्त होते कलापिनीच्या ४७ व्या वर्धापन दिनाचे या दिमाखदार सोहळ्यात सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच नटराजांची पुजा पार पडली.त्यानंतर दिनेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या कलापिनीगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ जाहला.त्यानंतर कीर्तीवंत नृत्यांगना किर्ती ढेंबे आणि सहकार्यांनी वैभव जोशी यांच्या गाजलेल्या गीतांवर बहारदार नृत्य सादर केले.त्यानंतर प्रास्ताविक कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी ४७ वर्षातील संस्थेची प्रगती तसेच जाहलेले आणि पुढे जात असलेल्या कलापिनी नाट्यसंकुलाच्या प्रगतीचा लेखाजोखा मांडला आणि कलापिनीच्या नाट्यगृहाचा गौरव केला….त्यानंतर कलापिनी संस्थेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शिलेदारांचा सन्मान करण्यात आला.त्यानंतर मुख्य कार्यक्रम म्हणजे मुलाखत वैभव जोशी यांची मुलाखत सुप्रसिद्ध निवेदिका विनया केसकर आणि तडफदार युवा निवेदक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या विराज सवाई यांनी खुमासदार मुलाखत घेतली ….या मुलाखतीचे वैशिष्ट्य हे की वैभव जोशी यांना विनया केसकर आणि विराज सवाई यांनी रसिकांच्या मनातले प्रश्न विचारले ….आणि त्यामुळेच मुलाखत रंगतदार झाली …..या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.आणि आलेल्या सर्व श्रोतृवर्गाने सातत्याने देत राहीलेल्या प्रतिसादामुळे कार्यक्रमाला मजा आणली . विशेषतः वैभव जोशींनी सादर केलेल्या कवितांना जो प्रतिसाद मिळत होता तो वाखाणण्यासारखा होता ….हा प्रतिसाद बघून वैभव जोशी यांनी आपल्या वक्तव्यात याचा उल्लेख असा केला की, पुरस्कार सोहळे अनेक असतात पण आजचा हा कार्यक्रम नुसता पुरस्कार सोहळा किंवा मुलाखत नसून हा एक ह्रद्य सोहळा आहे. मावळातल्या रसिकांसाठी ही एक शाबासकीची थापच म्हटली पाहिजे.या मुलाखतीत पुढे वैभव जोशी यांनी जे कवितेच्या व्याकरणाबद्दल सांगितले ते रसिकांना फारच भावले आणि बोलताना अथवा लिहिताना पुर्ण शब्दांमध्ये लिहिलं अथवा बोललं गेल्यास त्यातला धीर गंभीर भाव हा व्यक्त होत असतो आणि आपले मुद्दे आपल्याला अधिक प्रभावीपणे मांडता येऊ शकतात. हे फार महत्त्वाचे आहे. कविता हे माध्यम म्हणजे फापट पसारा त्याच्यात असता कामा नये तर मुद्देसूद आणि तितकंच चमचमीत असेल तर ते ऐकणाऱ्याला भिडतं. आणि मुळात दुसऱ्याच्या भावना आपल्या कवितेतून मांडण्याच्या भानगडीत न पडता शक्यतो आपण आपल्याला भिडणाऱ्या, जाणवणाऱ्या, आपल्या आतून आलेल्या भावनांना आपण जर शब्दबद्ध केलं तर ते अधिक प्रभावी ठरतं. आपल्या डोळ्यातून आलेला एक अश्रू हा समोरच्यालाही जाणवतो आणि नकळतपणे त्याच्या भावना सुद्धा आपल्या भावनांमध्ये मिश्रित होऊन एक फार सुरेल संगम तयार होतो. वैभव जोशी यांच्या मुलाखतीतून मिळालेली ही फार अमूल्य गोष्ट आहे. की आपल्याला आपल्या भावना शब्दात मांडता येण्यासाठी मुळात आपण त्याच्यावर विचार करण्याची गरज आहे. एकदा शब्दांची साथ मिळाली की मग आपण आपली भावना रुपी कविता जी की सच्ची आहे ती प्रामाणिकपणे आपण जर मांडली तर ती समोरच्याच्या हृदयाला भिडतेच भिडते …कारण शेवटी माणसाची भावना माणसालाच भिडते …इतकेच




