“संत साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली-“ह.भ.प. किसन महाराज चौधरी

मावळ मराठा न्युज -पिंपरी-चिंचवड,(दि.२८) संत परंपरेने चालविलेल्या मराठी भाषेत जात,धर्म,वंश, प्रांत अशाप्रकारे कोणत्याही प्रकारचा भेद नाही,संघर्ष नाही;ती परतत्वाला स्पर्श करणारी अभिजात भाषा आहे.त्यामुळे ठामपणे सांगता येईल की,संत साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली.”असे प्रतिपादन प्रवचनकार ह.भ.प.किसन महाराज चौधरी यांनी केले. गुणवंत कामगार कल्याण मंडळाचा पाचवा वर्धापन दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कविसंमेलनात ते बोलत होते.बिना इंग्लिश मीडियम स्कूल,आकुर्डी येथे संपन्न झालेल्या या संमेलनात साहित्यिक राज अहेरराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.त्यावेळी मंडळाच्या अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के,शब्दधन काव्यमंचचे सुरेश कंक,विधीज्ञ दिलीप सातपुते,विधीज्ञ अंतरा देशपांडे,मंडळाचे पुणे शहराध्यक्ष महादेव धर्मे, छायाचित्रकार किरण टकले आदी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की,”संतांनी ज्याप्रमाणे अवघड गोष्टी सहज सोप्या करून दाखविल्या, प्रासादिक स्वरूपात आध्यात्माची मांडणी केली; त्याप्रमाणे कवीने कवितेतला अभिजात भाव प्रकट करावा. कारण कविता ही मनातील उत्स्फूर्त भाव व्यक्त करण्याचा आविष्कार आहे.ती समाजहित जपते.त्यामुळे कोणतेही काव्य विमनस्कावस्थेत न लिहिता ते विवेकशील अवस्थेत लिहावे,विचारांच्या जागृतावस्थेत लिहावे.” मराठी भाषा आणि काव्यनिर्मिती यावर बोलताना प्रमुख पाहुणे राज अहेरराव म्हणाले,”जागतिक स्तरावर आणि विशेषतः महाराष्ट्र भूमीत मराठी भाषेचे अनेक आविष्कार बघायला मिळतात.त्यातील विविधता समजावून घेतली,तर मराठी भाषेतील अभिजात आविष्कार अभिजनापर्यंत पोहोचण्यास मदत होईल.” गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या प्रेरणास्थान तथा संस्थापक/अध्यक्षा डॉ.भारती चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि अशाच प्रकारची संमेलने विविध भागात साकारण्याचा मनोदय व्यक्त केला. ग्रंथपूजन आणि सरस्वती पूजनाने कविसंमेलनाची सुरुवात झाली.त्यावेळी कवयित्री शामला पंडित,दत्तू ठोकळे,सुभाष चटणे,रेणुका हजारे,जयश्री श्रीखंडे,तानाजी एकोंडे,सुरेश कंक,सुभाष चव्हाण,महंमदशरीफ मुलाणी, शोभा जोशी,सुहास घुमरे, मयुरेश देशपांडे,बाळासाहेब साळुंके,नामदेव हुले,आण्णा जोगदंड,बी.एन.चव्हाण,शशी सुतार,महेंद्र गायकवाड,अरुण कांबळे,कैलास भैरट,दिलीप सातपुते,श्रीकांत कदम,प्रतिमा काळे,शिवाजी शिर्के,हेमंत जोशी इत्यादी.अशा प्रकारे जवळपास ३५ कवींनी अर्थावाही कविता सादर केल्या. तानाजी एकोंडे,महंमदशरीफ मुलाणी, राजेश हजारे,संजय गोळे,भरत शिंदे,आण्णा जोगदंड,बाळासाहेब साळुंके,महेंद्र गायकवाड यांनी संयोजन केले.शंकर नाणेकर, रघुनाथ फेगडे,सतीश देशमुख, अशोक सरपाते,सोमनाथ पतंगे,सुरेश कंक,शामला पंडित,नंदकुमार धुमाळ,लक्ष्मण इंगवले,यांनी सहकार्य केले. महंमदशरीफ मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. तानाजी एकोंडे आणि हेमंत जोशी यांनी बहारदार सूत्रसंचालन केले.बाळासाहेब साळुंके यांनी आभार मानले. ह.भ.प.किसन महाराज चौधरी यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page