‘आई वडिलांमुळे मी घडलो!’-अरुण बोऱ्हाडे,चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी’शब्दधन काव्यमंचचा स्तुत्य उपक्रम

मावळ मराठा न्युज-पिंपरी,(प्रदीप गांधलीकर) दिनांक : १४ जुलै २०२५) ‘आई वडिलांमुळे मी घडलो!’ असे कृतज्ञतापूर्वक उद्गार ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे रविवार, दिनांक १३ जुलै २०२५ रोजी काढले. शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण बोऱ्हाडे यांना ज्येष्ठ साहित्यिक शिवाजी शिर्के यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार, नंदकुमार सातुर्डेकर, डॉ. विश्वास मोरे, अविनाश चिलेकर, संदीप तापकीर, गीतांजली बोऱ्हाडे, अशोकमहाराज गोरे, राधाबाई वाघमारे, मुरलीधर दळवी, दत्ता कांगळे, सुभाष चटणे, डॉ. सीमा काळभोर, शामला पंडित, डॉ. लता पाडेकर, प्रा. विद्यासागर वाघेरे, राजेंद्र गवते, दादाभाऊ गावडे आणि शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.तानाजी एकोंडे यांनी गायलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविकातून, ‘शहरातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या कार्यकर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात येते!’ अशी भूमिका मांडली; तर सुरेश कंक यांनी रौप्यमहोत्सवी शब्दधन काव्यमंचाच्या वैविध्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. पिंपरी – चिंचवड व्याख्यानमाला मुख्य संयोजक सुहास पोफळे यांनी बोऱ्हाडे यांच्या शालेय वयातील आठवणींना उजाळा दिला; तर नंदकुमार सातुर्डेकर यांनी त्यांच्या पत्रकारितेसह सामाजिक कार्यातील उल्लेखनीय घटनांचा ऊहापोह केला. संतोष घुले आणि प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी बोऱ्हाडे यांच्या साहित्यिक अन् संघटक या पैलूंविषयी भाष्य केले. शामराव सरकाळे, अण्णा गुरव, सीमा जाधव यांनी कवितांचे सादरीकरण केले. सत्काराला उत्तर देताना अरुण बोऱ्हाडे यांनी, ‘विद्यार्थिदशेत महाराष्ट्राचे सह्याद्री यशवंतराव चव्हाण यांच्या वैचारिकतेचा अन् सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा सखोल परिणाम झाला. त्या प्रभावातून राज्यशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पत्रकारितेची पदवी प्राप्त करून काही काळ पत्रकारिता केली. सामाजिक अन् कामगार क्षेत्रात सक्रिय योगदान देत असतानाच सुमारे सोळा पुस्तकं प्रकाशित झाली. जीवनात अनेकदा मोहाचे क्षण आलेत पण आईवडिलांच्या संस्कारांमुळे कधी सन्मार्गापासून ढळलो नाही!’ अशा भावना व्यक्त केल्या. शिवाजी शिर्के यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘अरुण बोऱ्हाडे हे कामगाररत्न आहेत!’ असे गौरवोद्गार काढून ‘कामगार साहित्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी!’ अशी अपेक्षा व्यक्त केली.कार्यक्रमाच्या संयोजनात प्रमोद बोऱ्हाडे, पृथ्वीराज बोऱ्हाडे, प्राजक्ता बोऱ्हाडे, क्रांती बोऱ्हाडे, हर्ष बोऱ्हाडे, कौस्तुभ बोऱ्हाडे, श्रीहरी तापकीर, दामोदर वहिले, अभिषेक बनकर, योगेश कोंढाळकर, अशोक ढोकले, संजय गमे, तेजस्विनी देशमुख यांनी परिश्रम घेतले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. न्यू इंग्लिश स्कूल माण (मुळशी) चे मुख्याध्यापक अंबादास रोडे यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page