निसर्ग हाच सर्वशक्तिमान निर्माता – कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के; रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालयात सात दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा समारोप

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : १८ डिसेंबर २०२५ ‘निसर्ग हाच सर्वशक्तिमान निर्माता असून अतिप्राचीन काळापासून माणूस निसर्गात हस्तक्षेप करत आहे!’ असे विचार सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, संभाजीनगर, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. महात्मा फुले महाविद्यालय आयोजित सात दिवसीय स्वयं अर्थसहायित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषद व चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी डॉ.ज्ञानदेव म्हस्के बोलत होते. प्राचार्य डाॅ. पांडुरंग भोसले अध्यक्षस्थानी होते; तसेच हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे, करमाळा येथील यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश करे पाटील, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, स्वप्ना हजारे, संजय पोकळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया येथील डॉ. प्रणाली देवरे, कोल्हापूर येथील प्रा. डॉ. विनोद शिंपले, संभाजीनगर येथील प्रा. डॉ. चंद्रशेखर हिवरे, इनर व्हीलच्या अध्यक्ष कमलजीत कौर, प्रा. डॉ. स्नेहल कुलकर्णी, प्रा. डॉ. महेश खर्डे, अरुण जवळे आदी मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.डॉ. ज्ञानदेव म्हस्के पुढे म्हणाले की, ‘जगात विध्वंसक गोष्टी वाढत असताना विज्ञानाने विधायक मार्ग शोधणे आवश्यक आहे. विज्ञानातील विविध शाखा या एकमेकाला पूरक आहेत. विशेषत: सूक्ष्मजीवशास्त्राचा सर्व क्षेत्रांमध्ये प्रभावी उपयोग करून शाश्वत विकास साध्य करता येईल!’ डॉ. गणेश करे पाटील यांनी, ‘एकूण ७७५ शाखा आणि सुमारे साडेचार लाख विद्यार्थी असलेल्या रयत शिक्षण संस्थेतील महात्मा फुले महाविद्यालय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून ‘बायो – फ्युजन २०२५’ हा संकल्प राबविते, ही ऐतिहासिक बाब आहे. अशा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नोबेल पुरस्काराच्या दर्जाचे संशोधन करून बौद्धिक संपदा हक्कांची नोंदणी करावी!’ अशी अपेक्षा व्यक्त केली. या सर्व परिषदांचे प्रमुख आयोजक प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘पर्यावरणरक्षण ही काळाची गरज असून सर्व विज्ञानशाखांचा समन्वय साधला जावा या उद्देशाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. भावी काळात महात्मा फुले महाविद्यालय हे संशोधनाचे केंद्रबिंदू म्हणून कार्यरत राहील!’ अशी ग्वाही दिली.महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून ए आय संचलित दीपप्रज्वलनाने समारोप सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. बायो -फ्यूज़न २०२५’या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या संयोजक प्रा. डॉ. संगीता अहिवळे यांनी प्रास्ताविकातून, पाच विद्यापीठातील सुमारे पस्तीस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिषदेत सहभाग घेतला. बुधवार, दिनांक १० डिसेंबर ते १८ डिसेंबर या कालावधीत सात दिवसीय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत वेगवेगळ्या शाखांच्या वतीने’थिंक ग्रीन, कॅल्क्युलेट क्लीन’ , ‘भाषा व साहित्य विकासात भाषांतराचे योगदान’ , ‘भूगोल आणि शाश्वत पर्यटन’ , ‘इमर्जिंग ट्रेण्डस् इन इंटरप्रिनिअरशिप’ , ‘भारताचे बदलते परराष्ट्र धोरण : आव्हाने आणि संधी’ , ‘ए आय, मानसशास्त्र, ग्रंथशास्त्र व शारीरिक शिक्षण’ , ‘बायो फ्युजन २०२५’ या संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय चर्चासत्रातून मार्गदर्शन करण्यात आले; तसेच सहभागी विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण शोधनिबंध सादर केले, अशी माहिती दिली. प्रा. डॉ. सुहास निंबाळकर, प्रा. डॉ. कामायनी सुर्वे,प्रा. डॉ. नीलकंठ डहाळे, प्रा. डॉ. सचिन चव्हाण यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. ऐश्वर्या वाळुंज आणि प्रा. सुप्रिया पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संजय पोकळे यांनी आभार मानले. –

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page