“शब्द समजून घ्या; पण नि:शब्दाला मान द्या!” – सुधीर गाडगीळ

मावळ मराठा न्यूज – तळेगाव स्टेशन(प्रदीप गांधलीकर) दिनांक : २० मार्च २०२३”शब्द समजून घ्या; पण नि:शब्दाला मान द्या!” असे प्रतिपादन ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी श्री गणेश मंदिर प्रांगण, राजगुरव कॉलनी, तळेगाव-दाभाडे स्टेशन येथे रविवार, दिनांक १९ मार्च २०२३ रोजी केले. श्री गणेश प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय गणेश व्याख्यानमालेत ‘मला भेटलेली माणसे’ या विषयावर अंतिम पुष्प गुंफताना सुधीर गाडगीळ बोलत होते. उद्योजक अशोक काळोखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गणेश मोफत वाचनालयाचे अध्यक्ष प्रशांत दिवेकर, उद्योजक विलास काळोखे, श्री गणेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव वर्तले, सचिव दिलीप राजगुरव यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानापूर्वी, पक्षी संवर्धनासाठी कार्य करणारे अविनाश नागरे, दुर्ग अभ्यासक डॉ. प्रमोद बोराडे आणि क्रीडा क्षेत्रात उच्चशिक्षण पूर्ण केल्याबद्दल सुरभी पुराणिक यांचा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर व्याख्यानमालेसाठी अर्थसाहाय्य करणाऱ्या अरुणा गुणे, राजेश सूर्यवंशी, संदीप शेळके, अजित पालव, नाना कुटे, अजय जैन-सोलंकी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतातून अशोक काळोखे यांनी, “सर्वांगीण प्रगती करताना माणसाने माणुसकीचे भान ठेवावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली. सुधीर गाडगीळ पुढे म्हणाले की, “माणसे हा माझा कुतूहलाचा विषय आहे. शब्दांची मांडणी अन् आवाजाचा नाद मला मोहवत गेला. पन्नास वर्षांपासून दैनंदिनी लिहिण्याचा छंद मला निवेदन क्षेत्रात साहाय्यभूत ठरला. निवेदन करताना अलंकारिक शब्दांची आतषबाजी न करता विविध किस्से, हकिकती, गमतीजमती सांगत गेल्याने निवेदनाला वलय प्राप्त झाले. साधे, सोपे अन् सहज बोलण्याचा पु. ल. देशपांडे यांचा गुण मला खूप भावला. चौफेर वाचन हा निवेदनाचा मूळ गाभा आहे. तसेच समोरची व्यक्ती कोणत्याही स्तरावरची असली तरी तिला मनापासून आदर दिल्यास सहज संवाद साधता येतो. वेगवेगळ्या माध्यमातून काम करण्याची संधी मला मिळाली अन् त्यांतून विविध क्षेत्रातील सुमारे सहा हजार तीनशे पस्तीस वलयांकित व्यक्तींना बोलते करण्याचे भाग्य मला लाभले!” राजकारण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्य, कला अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रातील सुप्रसिद्ध निवडक व्यक्तींच्या वैशिष्ट्ये, लकबी, खासियत याविषयी खुमासदार शैलीत गाडगीळ यांनी आपल्या पन्नास वर्षांहून अधिक काळापासून भेटलेल्या व्यक्ती अन् वल्लींचे शब्दांच्या माध्यमातून सप्तरंगी दर्शन घडविले.बच्चुशेठ तांबोळी, गिरीश खेर, उमाकांत महाजन, अश्विनी शेलार, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. ओंकार वर्तले यांनी सूत्रसंचालन केले. मयूर राजगुरव यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page