*’मानवी दिलासा पुरस्कार’ प्रदान करून प्रत्यक्ष कामाच्या जागी जाऊन कष्टकरी कामगारांना केले सन्मानित*








मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर )दिनांक : ३० एप्रिल २०२६ दिलासा संस्था आणि पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने १ मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला कष्टकरी कामगारांना ‘मानवी दिलासा पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या कामाच्या जागी सन्मानित करण्यात आले. यामध्ये धोंडीबा लक्ष्मण वाघमारे आणि कस्तुरा धोंडीबा वाघमारे हे (चर्मकार) दांपत्य, राजू काळूराम पवार आणिशालन राजू पवार हे (लोहार) दांपत्य तसेच रवींद्र नारायण डोळस (सांगवी स्मशानभूमी सेवक) यांचा समावेश होता. पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि अर्थसाहाय्य देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, जयश्री गुमास्ते, अरुण परदेशी, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, शाम बारसे हे सदस्य उपस्थित होते.यावेळी पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे म्हणाले, ‘ऊन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता दररोज हे कष्टकरी कामगार ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा!’ हे ब्रीद उराशी बाळगून काम करीत असतात. या कष्टकरी कामगारांचा यथोचित सन्मान करताना दोन्ही संस्थांना अत्यानंद झाला आहे!’नामदेव घाटणे, सोमनाथ राऊत, राम कांबळे, अशोक वाघमारे, सुनीता कांबळे, अनिता कांबळे, लक्ष्मण वाघमारे, सुभाष घाटणे गणपती घाटणे, दिनेश नाईकनवरे ही सन्मानार्थी यांची कौटुंबिक माणसे यावेळी उपस्थित होती. मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.



