“देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” – गिरीश प्रभुणे

मावळ मराठा न्यूज ,पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ०६ मे २०२३ “देव्हाऱ्याची जागा आता पुस्तकांच्या कपाटाने घ्यायला हवी!” असे मत ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी संत तुकाराम प्रतिष्ठान मंदिर प्रांगण, संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक ०६ मे २०२३ रोजी व्यक्त केले.‌ अक्षरग्रंथ या संस्थेच्या वतीने दिनांक ०६ मे ते १४ मे २०२३ या कालावधीसाठी आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची व्यासपीठावर तसेच माजी नगरसेवक वसंत शेवडे, ज्येष्ठ कवी निशिकांत गोडबोले, श्यामराव सरकाळे यांची यावेळी रसिकांमध्ये प्रमुख उपस्थिती होती. श्रीकांत चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “राजर्षी शाहूमहाराज यांनी महाराष्ट्रात सर्वात प्रथम फिरते वाचनालय सुरू करून वाचनचळवळीचा पाया घातला!” अशी माहिती दिली. वीस नामवंत प्रकाशनाच्या सुमारे दहा हजार पुस्तकं असलेल्या या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करताना गिरीश प्रभुणे यांनी लहान मुलांना आवडलेली पुस्तकं खरेदी करून त्यांना बक्षीस म्हणून दिल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला.चित्रसेन गोलतकर यांनी स्वागत केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. पौर्णिमा गोलतकर यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page