लोणावळा नगरपरिषद प्रशासनाकडून मोठा भ्रष्ट्राचार? जागरूक नागरिक संघाचा १९ सप्टेंबर पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा

लोणावळा : गेली अडीच तीन वर्षांपासून लोणावळा नगर परिषद प्रशासनाकडून प्रशासकीय कारभार सुरु आहे अधिकारी यांचेवर लोकप्रतिनिधी यांचा अंकुश नाही त्यमुळे त्यांचा मनमानी कारभार सुरु आहे जनतेच्या पैशांची सर्रास लूट चालू आहे.याकाळात तीन हुन अधिक मुख्याधिकारी येऊन गेलेत. विद्यमान मुख्याधिकारी अशोक साबळे यांचा मोठा थाट आहे. ते आपल्या मस्तीत असतात.त्यांना भेटायला येणारी जनता म्हणजे त्यांना लोणावळा नगरपरिषदेचा कचरा वाटत असेल हा त्यांचा भ्रम आहे.त्यांनी लोणावळ्यातील नागरिकांना भेटणे त्यांची समस्या जाणून घेणं हेच त्यांचं आद्य कर्तव्य आहे.एकवेळी जिल्हाधिकारी,मंत्रालय यांना नाही भेटले तरी चालू शकेल.हवं त्यांनी ध्यानात घ्यावे.स्थानिक पत्रकार आणि नागरिकांना न भेटणे आणि त्यांचा फोन न घेणे हे कुठल्या गुर्मीचे लक्षण आहे ? त्यांचा दालनात ठिय्या आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना न भेटणं त्यांचा ही फोन न घेणं असली मस्ती लोणावळेकर नागरिक सहन करणार नाहीत. तुम्ही जनसेवक आहात,लोणावळा नगरपरिषदेचे मालक नाहीत.विविध विकास कामे लोणावळ्यात सुरु आहेत.त्याबद्दल जनतेला ती कळावीत यासाठी त्यांनी वारंवार पत्रकारांना बोलावून जनतेला माहिती देणे आवश्यक असताना ती माहिती तर देत नाहीतच पण पत्रकार यांनी सदर माहिती घेण्यासाठी फोन केला तरी उत्तर देत नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे.लोणावळा शहरांत विविध विभागातील कामे करण्यासाठी मनुष्यबळ पुरवणे कामाची निविदा चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आली असल्याचा आरोप करत जे काम पूर्वी सात ठेकेदार ५ .५० कोटी मध्ये करत होते त्या कामासाठी तब्बल १२ कोटी रुपये एकाच ठेकेदाराला देण्याचा घाट का घातला जात आहे ? ही लोणावळाकर नागरिकांच्या कर रुपी पैशाची लूट असल्याचा आरोप करत सदरची निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा लोणावळा जागरुक नागरिक यांनी निवेदनाद्वारे नुकताच लोणावळा नगरपरिषदेला दिला आहे. जागरूक नागरिकच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी तथा प्रशासक यांची भेट घेत त्यांना याबाबत विनंती केली. असे असताना देखील आज १२ सप्टेंबर रोजी सदर कामाची वर्क ऑर्डर बीव्हीजी कंपनीला देण्यात आली आहे. लोणावळा शहरातील जागरूक नागरिक, सर्व राजकीय पक्ष, मावळचे आमदार सुनील शेळके या सर्वांनी याबाबत लेखी निवेदने देऊन व विनंती करून देखील प्रशासन कोणालाच दाद देत नसल्याने जागरूक नागरिक यांच्यावतीने संताप व्यक्त केला जात आहे. या मनमानी कारभाराच्या विरोधात येत्या १९ सप्टेंबर पासून बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा जागरूक नागरिक नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. या बेमुदत साखळी उपोषणात सर्व राजकीय पक्ष व संघटना सहभागी होणार आहेत. सदरचे काम एका विशिष्ट कंपनीला मिळावे याकरिता अधिकारी वर्गाने एक गुण तक्ता तयार करत त्या संस्थेच्या पारड्यात मते टाकली आहेत.याचाचअर्थ यात मोठा घोटाळा असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.अतिशय अनाकलनीय असा हा कारभार सुरू असून त्यामधून सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशाची मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे. या निविदा प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असल्याचा जागरूक नागरिकांचा आरोप आहे. याकरिता सदरची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी. लोणावळ्यातील सर्व पक्षीय प्रमुख व जागरूक नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय प्रशासनाने घेऊ नये अशी मागणी जागरूक नागरिकांनी केली आहे. याकरिता जिल्हाधिकारी, विभागीय अधिकारी व मावळचे आमदार सुनील शेळके यांना देखील निवेदने देण्यात आली आहेत,असे असून प्रशासनाकडून ठेकेदाराला वर्क ऑर्डर देण्यात आल्याने सर्वांनी याबाबत आश्चर्य व्यक्त करत ही लोणावळाकर नागरिकांच्या कररुपी पैशाची उधळपट्टी आहे. तसेच ज्या ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे ती कंपनी समाधानकारक काम करत नसल्याने अनेक नगरपालिकांमधून काळ्या यादीत टाकली गेली असल्याचा जागरूक नागरिकांचा आरोप आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page