मराठी भाषिक म्हणून आपली जगात ओळख – डॉ. महादेव वाळुंज





मावळ मराठा न्युज -लोणावळा, जगामध्ये मराठी ही दहाव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आजही भारतभर आणि जगभर मराठी भाषा बोलणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात. भाषा ही कधीही मरत नसते ती नवे रूप घेऊन येत असते. मराठी भाषेला दोन हजार चारशे वर्षापूर्वीचा इतिहास लाभला आहे. मराठीतील कोशवाड्मय हे जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये चौदा कोटी लोकसंख्या मराठी भाषा बोलत आहे. एखाद्या सणाच्या निमित्ताने जगामध्ये दिवाळी अंक मराठीमध्ये काढणारा महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे मराठी भाषिक म्हणून आपली ओळख जगभर पसरली आहे. असे मत कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, भिगवणचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी व्यक्त केले. निमित्त होते लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालाचा मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडादिनानिमित ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा’ या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, डॉ. अमर काटकर, डॉ. धनराज पाटील आणि प्रा. संदीप लबडे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.डॉ. वाळुंज म्हणाले, ‘व्यक्तिमत्त्व विकासात मातृभाषेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मातृभाषेची पाया आणि भिंत मजबूत असेल तर अनेक भाषांच्या खिडक्या आपल्याला उघड्या होत असतात. मातृभाषेच्या अभ्यासाने आणि ज्ञानाने मनुष्यात नम्रता येत असते. वैचारिक, मानसिक आणि भावनिक क्षमता वाढविण्यासाठी निरंतर वाचन हे आवश्यक आहे. वैचारिक क्षमता आल्याने मनुष्याला विचारांच्या कल्लोळातून मार्ग काढून पुढे जाता येत असते. म्हणून व्यक्तिमत्त्व विकासात भाषिक कौशल्य ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख म्हणाले, ‘ भाषेचा जन्म मानवाच्या उत्क्रांतीबरोबरच झाला आहे. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. मानसशाश्त्रामध्ये व्यक्तिमत्त्व हा घटक फार महत्वपूर्ण मानला जातो. त्यावरच जगभरामध्ये जास्त अभ्यास आजही केला जात आहे. मनुष्याचा डावा गोलार्ध हा भाषेशी संबधित असतो. त्यामुळे त्याला भाषा ही शिकावी लागते. शिक्षण हे तुमच्या अंतरंगातील कलाकुसरीला हात घालत असते. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासात भाषा हा घटक महत्त्वाचा मानला जातो असे देशमुख सरांनी सांगितले. मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मराठी भाषा संवर्धनासाठी ग्रंथ दिंडी,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा काव्यवाचन स्पर्धा मराठी स्वाक्षरी मोहीम सामूहिक वाचन तसेच ‘मराठी वाचन कट्टा’ इत्यादी उपक्रमांचे आयोजन केले जाते. उपक्रमांचा व्यक्तिमत्त्व विकासासाठी निश्चितच उपयोग होईल असे सांगितले. तसेचया कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.संदीप पोकळे ,प्रा.सोमनाथ आपटे, डॉ. मल्हारी नागतिलक, डॉ. दीपक कदम ,प्रा. गणेश आखाडे, प्रा. भूषण गोंदके, , ग्रंथालयातील चांगुणा ठाकर डॉ.श्रीकांत होगले व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवारुतीला प्रथम वर्ष पदवी वर्गातील कु. सायली धुमाळ, कु. आरती दळवी, कु. वैष्णवी साबळे आणि कु. अरुणा गोपाळे यांनी ‘हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे’ हे गीत गायले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. संदीप खाडे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार डॉ. धनराज पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील वाघ यांनी केले.




