स्वामी विवेकानंद विद्यामंदिर,दापोडी; पंचेचाळीस वर्षांनंतर पुन्हा भरला दहावीचा वर्ग

मावळ मराठा न्युज नेटवर्क -पिंपरी,(प्रदीप गांधलीकर)दिनांक : २४ मार्च २०२५ स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, दापोडी या शाळेच्या १९८० – ८१ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी रविवार, दिनांक २३ मार्च २०२५ रोजी आयोजित केलेल्या विद्यार्थी स्नेहमेळावा आणि शिक्षक सन्मान या कार्यक्रमाचे रूपांतर नकळत दहावीच्या वर्गात झाले आणि तत्कालीन शिक्षकांसह सर्व माजी विद्यार्थी तब्बल पंचेचाळीस वर्षांनंतर भूतकाळातील रम्य आठवणींमध्ये रममाण झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते अध्यक्षस्थानी होते; तसेच सुभाष कुलकर्णी, बाळकृष्ण घोरपडे, विजय दीक्षित, सुभाष गाडोते, विद्यमान प्राचार्य पी. डी. पाबळे, संस्था सचिव सुभाष जावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.स्वामी विवेकानंद आणि संस्थापक जयवंत जगताप यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रगीतानंतर भास्कर रिकामे यांनी शहीद दिनाचा थोडक्यात इतिहास सांगून शहीद भगसिंग, हुतात्मा राजगुरू व सुखदेव यांना सामुदायिक मानवंदना दिली.वर्गात प्रवेश करण्यासाठी लंगडी खेळत जाण्याची अट असल्याने वयाची साठी गाठलेल्या सुमारे ७७ विद्यार्थ्यांचे व्रात्य, खोडकर मुलामुलींमध्ये रूपांतर झाले. पंचेचाळीस वर्षांच्या कालावधीत दिवंगत झालेल्या सवंगडी अन् शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चंद्रशेखर कदम यांनी प्रास्ताविकातून, ‘सन १९८० – ८१ च्या बॅचमधून यशस्वी होत फीनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन विविध क्षेत्रांत आपण कर्तबगारी बजावली तरी शाळेतील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण जमलो आहोत!’ अशी भूमिका मांडली. प्रवीण चोरडिया यांनी माजी गुरुवर्यांसह तत्कालीन कर्मचारी यांचा परिचय करून दिला. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून त्यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तपस्विनी शामा लुंकड आणि अंध विद्यार्थ्यांसाठी आश्रम चालविणारे चंद्रशेखर कदम या माजी विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.प्रा. डाॅ. शिवाजीराव मोहिते यांनी, ‘नुकत्याच उमललेल्या टवटवीत फुलांप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांचे चेहरे पाहून मन प्रसन्न झाले आहे. प्रत्येक जण हा स्वतःचा शिल्पकार असतो. सुसंस्कारांचे संचित तुम्हाला लाभले. आता उतारवयात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी वाचन अन् चांगल्या मित्रांना जीवनात स्थान द्या!’ असा संदेश दिला. सुभाष कुलकर्णी यांनी, ‘आज आयुष्याच्या पुस्तकातील पंचेचाळीस पाने मागे गेली. आपल्या गुरुप्रति असलेल्या प्रेमाला मनापासून दाद द्यावीशी वाटते!’ अशी भावना व्यक्त केली. बाळकृष्ण घोरपडे यांनी आपल्या शिक्षक म्हणून घडलेल्या कारकिर्दीतील आठवणी जागवल्या. विजय दीक्षित, सुभाष गाडोते यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पी. बी. पाबळे यांनी शाळेच्या नूतन इमारतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित रुपये ३५०००/- चा मदतनिधी विद्यमान प्राचार्य आणि संस्थेचे सचिव सुभाष जावळे यांच्याकडे सुपूर्द केली. याशिवाय रामदास कांबळे आणि चंदा ढोरे या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी रुपये ५०००/- चा वैयक्तिक मदतनिधी सुपूर्द केला. सुभाष जावळे यांनी शाळेचा इतिहास आणि जडणघडण कथन केली. शाळेच्या वतीने रामदास कांबळे, शोभा पगारे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त मनोगतांमधून वयाचे, सामाजिक शिष्टाचार अन् गांभीर्याचे मुखवटे गळून पडले आणि सर्वांनी धमाल मजामस्तीचा अनुभव घेतला. शैला सुरगुडे, गुरुदत्त पाटील, दीपक शेडगे, सतीश महाजन, राजू मडगावकर, पौर्णिमा सस्ते, उषा पवार, रमेश जाधव, अशोक धावडे, आनंद घुले, घनश्याम कड, चंदा सुराणा, नंदा काळोखे, नंदकुमार ऐनपुरे, राकेश कांदळकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले. भास्कर रिकामे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण चोरडिया यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने शाळेचा तास संपला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page