कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला उपेक्षित,दुर्लक्षित कामगारांना “मानवी दिलासा पुरस्कार ” प्रत्यक्ष कामाच्या जागी जाऊन..

मावळ मराठा न्युज -(सुरेश कंक)पिंपळे गुरव, दिलासा संस्था आणि मानवी हक्क संरक्षण जागृती या संस्थांच्या वतीने एक मे कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला  उपेक्षित  कष्टकरी कामगारांचा त्यांच्या कामाच्या जागी जाऊन यथोचित सन्मान करण्यात आला.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या घंटागाडीवर काम करणाऱ्या जयश्री म्हस्के, ऊन, पाऊस, थंडीत देखील रोज वृत्तपत्र विक्री करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या राऊबाई बिराजदार, पोटासाठी हातगाडीवर केळी विकणाऱ्या अनिता जयस्वाल,  पिंपळे गुरव स्मशानभूमीत काम करणारे कामगार विठ्ठल देवकर या कामगारांना त्यांच्या कामाच्या जागी जाऊन ” मानवी दिलासा पुरस्कार” शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, साडीचोळी, पोशाख  तसेच संस्थेच्या वतीने रोख अर्थसहाय्य देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला काश्मीर पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना आदरांजली वाहण्यात आली.   मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यावेळी म्हणाले, “मानवी दिलासा पुरस्कार ” दोन्ही संस्थेच्या वतीने प्रथमच शहरात देण्यात येत आहे. सध्या देशात कामगार कायदे हे उद्योगधार्जीने झालेले असून असंघटित कामगारांची संख्या देशात मोठ्या प्रमाणावर झाली आहे त्यांच्या समस्याकडे कोणाचे लक्ष राहिलेले नाही त्यांनाही छोटासा आनंद देण्याचा प्रयत्न दोन्ही संस्थेच्या माध्यमातून केला.कष्टकरी कामगारांना त्यांच्या कामाच्या जागी जाऊन हा पुरस्कार प्रदान करताना आनंद वाटत आहे. माणसाला दिलासा मिळावा. जगण्याची नवी उमेद, प्रेरणा आणि आनंद मिळावा हीच आमची मनोकामना पुरस्कारा मागची आहे.” असे जोगदंड म्हणाले. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक म्हणाले.. ” हातावर पोट भरणारी  ही कामगार माणसे. त्यांचा सन्मान ते काम करीत आहेत त्याच जागेवर केला पाहिजे या उद्देशाने  उपेक्षित कामगारांना दोन्ही संस्थेच्या कार्यकर्त्यांनी सन्मानित केले आहे. विशेष बाब म्हणजे या उपक्रमासाठी अध्यक्ष, प्रमुख पाहुणे नाहीत तर संस्थेच्या  कार्यकर्त्यांच्या हस्ते अशा उपेक्षित घटकातील कामगारांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. प्रतिवर्षी  दोन्ही संस्थांच्या वतीने  मानवी दिलासा पुरस्कार देण्यात येतील.”याप्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड ,गुणवंत कामगार संगीता जोगदंड, जयश्री गुमास्ते, मीना करंजावणे,आरोग्य निरीक्षक स्नेहल सोनवणे, अशोकमहाराज गोरे,तानाजी एकोंडे,  नंदकुमार कांबळे, अरुण परदेशी,मुरलीधर दळवी, संजय गमे,निलेश भोसले, हनुमंत पंडित,विनोद कांबळे,दीपा गराडे, पवन रंधे, कविता भोहेर यांची उपस्थिती होते.      शामराव साळुंके यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page