*’अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून जाती अंतासाठी जागृती केली!’-प्रभाकर वंजारी*

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक-०२ऑगस्ट, २०२५’लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यातून जाती अंतासाठी जागृती केली!’ असे विचार सेवानिवृत्त साहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रभाकर वंजारी यांनी संत तुकारामनगर, पिंपरी येथे शनिवार, दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ रोजी व्यक्त केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर वंजारी बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते किरण सुवर्णा, अमीर शेख, रामेश्वर राऊत, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रभाकर वंजारी पुढे म्हणाले की, ‘अण्णाभाऊ साठे हे थोर साहित्यिक, लोकशाहीर व समाजसुधारक होते. त्यांचे साहित्य भारतातच नव्हे तर रशियातही लोकप्रिय झालेले आहे. जगन्नाथ नेरकर यांनी, ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचारवंत आणि वक्ते म्हणूनही समाजात लोकप्रिय होते. पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर उभी नसून श्रमिकांच्या तळहातावर उभी आहे, हे सत्य ठणकावून सांगणारे ते क्रांतिकारी होते!’ असे मत व्यक्त केले.

अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांचे विधिवत पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रदीप बोरसे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले. ग्रंथपाल वर्षा बोरसे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. याप्रसंगी स्थानिक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page