*संविधान हे वकिलांची भगवद्गीता! -ॲड. सतिश गोरडे; एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संपन्न*

मावळ मराठा न्युज -पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ०५ जुलै २०२६) ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अतुलनीय योगदानातून निर्माण झालेले भारतीय संविधान हे वकिलांची भगवद्गीता आहे!’ असे विचार पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतिश गोरडे यांनी गणेशनगर, दापोडी येथे शनिवार, दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी व्यक्त केले. एस. एस. पी. शिक्षण संस्था संचलित एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. सतिश गोरडे बोलत होते. पुणे ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. काळुराम भुजबळ अध्यक्षस्थानी होते; तसेच एस. एस. पी. शिक्षण संस्थेचे चेअरमन एस. बी. पाटील, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सुहास पडवळ, फॅमिली बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कल्पना निकम, प्राचार्या उज्ज्वला शिंदे, ॲड. वर्षा काळभोर, ॲड. बाजीराव दळवी, ॲड. अभिजित निकम, ॲड. प्रताप मोरे या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘निरसे दूध हे निरामय, निर्भेळ दिसत असलेतरी ते नासू नये म्हणून त्याला तापवावे लागते. समाजाचेही दुधासारखेच असते. त्याच्यातील अस्वस्थता कमी करण्यासाठी विधिसंमत कायद्यांचे नियंत्रण आवश्यक असते. नव्याने सुरू होत असलेल्या एस. एस. पाटील विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून विधी प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी आपल्या विधिसेवेतून अन्याय, अत्याचारमुक्त आणि एकसंध समाज घडवावा, अशा शुभेच्छा मी देतो!’ यावेळी दृष्टान्तकथा सांगून गोरडे यांनी आपले विचार प्रभावी शब्दांतून मांडले. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सुहास पडवळ यांनी, ‘एस. बी. पाटील हे एक चालतेबोलते विद्यापीठ असून पिंपरी – चिंचवड परिसरात त्यांनी खूप मोठे शैक्षणिक कार्य उभारले आहे!’ असे गौरवोद्गार काढले. एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविकातून, ‘शिक्षण कमी असूनही वयाच्या बाराव्या वर्षांपासून मी कामाला सुरुवात केली. अनेक अडीअडचणी आणि प्रतिकूल परिस्थितीतून या विधी महाविद्यालयाला मान्यता मिळविण्यात यश मिळाले आहे!’ , अशी माहिती दिली. ॲड. काळुराम भुजबळ यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘विधी शिक्षण हे आजच्या काळात खूप महत्त्वाचे अन् गरजेचे आहे. एका विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षपद मी भूषविले हा माझ्या जीवनातील एक संस्मरणीय क्षण आहे!’ असे मत व्यक्त केले. ॲड. कल्पना निकम आणि प्राचार्या उज्ज्वला शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. सचिव प्रा. चंद्रशेखर पाटील, कोषाध्यक्ष गणेश पाटील, प्रा. सुनील शेवाळे, आकाश पाटील यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. विधी महाविद्यालय प्राचार्या प्रा. सोनल देशमुख यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page