“‘एकात्मतेचे शिल्पकार…’ वस्तुनिष्ठ इतिहासाचा उत्तम वस्तुपाठ!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस

मावळ मराठा न्यूज :- सांगवी (प्रदीप गांधलीकर) दिनांक : १० एप्रिल २०२३ “‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ हा संशोधित चरित्रग्रंथ म्हणजे वस्तुनिष्ठ इतिहासाचा उत्तम वस्तुपाठ आहे!” असे गौरवोद्गार ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. पंकज पाटील आणि संदीप तापकीर लिखित ‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ या संशोधित ग्रंथाचे निळू फुले नाट्यगृह, काटेपुरम्, नवी सांगवी येथे रविवार, दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी प्रकाशन करताना सबनीस बोलत होते. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान, लेवा पाटीदार मित्रमंडळ आणि विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जळगाव विधानसभा आमदार सुरेश तथा राजूमामा भोळे होते. किर्लोस्कर ऑईल इंजिन लिमिटेडचे कारखाना व्यवस्थापक युवराज पवार, किर्लोस्कर ऑईल इंजिन एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष चंद्रकांत गोरे, स्थायी समिती माजी सभापती प्रशांत शितोळे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, डॉ. मिलिंद चौधरी आणि लेवा पाटीदार मित्रमंडळाचे अध्यक्ष भागवत झोपे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “‘राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार : बॅरिस्टर सरदार वल्लभभाई पटेल’ हा संशोधित ग्रंथ आधुनिक भारताच्या एकात्मतेसाठी व समृद्धीसाठी उपयुक्त ठरणारा वैचारिक ग्रंथ आहे. वल्लभभाईंच्या चरित्रासह भारताच्या इतिहासाचे अंतरंगी वास्तव या ग्रंथात सप्रमाण चित्रित झाले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील विविध प्रवाहांच्या गाभ्यातील सूत्रे या लेखनात तत्कालीन मानदंडाच्या संदर्भाने प्रकट झाली आहेत. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा संक्षिप्त इतिहासच अनुभवण्याची संधी वाचकांना मिळते!”संदीप तापकीर यांनी, “राजकीय मतभेद असूनही सहकारी नेत्यांविषयी आदर हा पटेल यांचा उल्लेखनीय गुण होता!” असे मत मांडले. पंकज पाटील यांनी, “चरित्रग्रंथातील प्रत्येक शब्द सरदारश्री यांना समर्पित आहे!” अशी भावना व्यक्त करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील महत्वाच्या बाबींचा उल्लेख केला. अन्य मान्यवरांनी आपल्या मनोगतांतून सरदार पटेल यांच्या व्यक्तिमत्त्वातील ठळक बाबींना उजाळा देत चरित्रग्रंथाच्या निर्मितीबद्दल लेखकांचे अभिनंदन केले. सुरेश तथा राजूमामा भोळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “ध्येयवेडे झाल्याशिवाय चरित्रलेखनासारखी उत्तुंग कामगिरी घडत नाही. राष्ट्रपुरुष हे संपूर्ण राष्ट्राचे असतात. त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे!” असे आवाहन केले.श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविक केले. ऊर्मिला पाटील यांनी चित्रफितींच्या माध्यमातून सरदार पटेल यांचा इतिहास साकार केला. प्रकाशन सोहळ्यानंतर प्रा. कमल पाटील यांनी ‘मी श्यामची आई बोलते हो!’ या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले.अंकुश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले.महेश बोरोले, उमेश पाठक, सोमनाथ कोरे, डॉ. लीलाधर पाटील, देवेंद्र पाटील, विलास पाटील, प्रेमचंद पाटील, संजय भंगाळे, ललित वायकोळे, भूषण गाजरे, रवींद्र पाटील, हर्षाली नेहते, अभय पाटील, प्रमोद पाटील, शैलेंद्र पाटील यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page