ऐतिहासिक स्वच्छतेचा वारसा जपला जावा -मितेश घट्टे

मावळ मराठा न्यूज:- लोणावळा,#‘महाराष्ट्राचे भूषण’ काय? हा प्रश्न जर कोणाच्या मनात आला तर असंख्य मुखातून गड, किल्ले, ऐतिहासिक धार्मिक स्थळे हे भुषणावह शब्द बाहेर पडतील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे आणि अद्भूत शुरविरते साक्षीदार असलेले गड, किल्ले आणि त्याबरोबरच आपण जिथे आस्थेने माथा टेकतो ती धार्मिक स्थळे यांची आजची स्थिती काय आहे? हा प्रश्न अनेकदा चर्चेत असतो, मात्र त्यावर नेमकं उत्तर आणि उत्तर शोधायला लागणारी कृती सहज पहायला मिळत नाही हे वास्तव नाकारू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात स्वच्छतेची मशाल पेटवेल असे ‘वारसा स्वच्छतेचा… मावळा शिवरायांचा’ हे ब्रीदवाक्य घेऊन पुणे ग्रामिण पोलिसांनी गड किल्ले स्वच्छता मोहिम सुरू केली. लोणावळा उपविभागाचेपरिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी यामधे पुढाकार घेतला. स्वच्छतेचा वसा घेतलेल्या मात्र योग्य वाट सापडत नसलेल्या छत्रपतींच्या मावळ्यांना आम्ही अभियानासाठी हाक दिली. ही हाक होती लोणावळ्यातील ऐतिहासिक धार्मिक स्थळ असलेल्या श्री एकवीरा देवी गड आणि कार्ला लेण्यांच्या परिसराच्या स्वच्छतेची…. या हाकेला बुधवारी दि. 26 एप्रिल रोजी हजारो मावळ्यांनी प्रतिसाद दिला. तो फक्त प्रतिसाद नव्हता, तर स्वच्छतेचा वारसा जपण्याची पेटलेली मशाल होती हे आम्ही याची देही याची डोळा अनूभवले. पहाटे वेहेरगांव येथे अगदी सहाच्या ठोक्याला स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य घेऊन सारे मावळे जमू लागले. त्यांच्यात एक उत्साह भरलेला दिसत होता. अपेक्षित स्वच्छतादूत जमल्यावर एकविरा गडाकडे प्रस्थान केले. स्वच्छता करत करत पुढे जात एकमेकांना ओळखीचा हात तर कधी अनोळखी हात पुढे येण्यास मदत करत होता. या अभियानामध्ये सिंहगड कॉलेज विद्यार्थी, शिवदुर्ग मित्र लोणावळा, क्लीन स्टार ग्रुप लोणावळा, पोलीस पाटील, पत्रकार, वकील, डॉक्टर, स्थानिक वेहेरगाव येथील नागरिक, मावळ तालुका येथील विविध सेवाभावी संस्था, सह्याद्री प्रतिष्ठान कामशेत, स्वयंसेवक ग्रुप, मुंबई नवी मुंबईतील मानाच्या पालखीचे सदस्य, आई एकविरा भक्त कार्ला येथील ग्रामस्थ हे सहभागी झाले….ना कोणाला मान ना कोणाला सन्मान, सगळे फक्त एकच ब्रिदवाक्य डोक्यात ठेवून आले होते ते म्हणजे….वारसा स्वच्छतेचा मावळा छत्रपतींचा…. सहायक पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्यासह सर्व पोलीस या मोहिमेत पुढे होते. गड चढत असताना झपाझप वेगाने पावले पडत होती, स्वच्छता सुरू होती. कार्ला लेण्यांसमोर सर्व कचरा एकत्रित केला, तेव्हा तो तब्बल दोन ट्रक भरेल एवढा होता. भला मोठा कचरा पाहून मन काहीसे खिन्न झाले. कारण आपल्या महाराष्ट्राचे भूषण असलेल्या गड, किल्ल्यांवरील ही स्थिती निश्चितच भविष्यात भूषणावह शब्दाला लाजवणारी आहे. पुणे जिल्हा हा छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा जगाच्या इतिहासावर ठळक करणारा जिल्हा आहे. या पाऊलखुणांनीच आजही शिवरायांचे शौर्य प्रत्येक गनिमाला धडकी भरवते. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचा वारसा घेऊन अध्यात्म जोपासणारा हा जिल्हा आहे. एवढा मोठा वारसा असताना आपण तो जतन करण्यासाठी काय करतो ? हा प्रश्न प्रत्येक मनाला पडावा अशी स्थिती सध्या आहे. नुकताच आपण स्वातंत्र्याचे अमृतमहोत्वी वर्ष साजरे केले. हे करत असताना मागे वळून पाहिल्यावर आपण आपला सार्वजनिक वारसा किती जपतो याचे दुःख नक्कीच होईल. ऐतिहासिक वास्तू प्रेरणा देतात तर धार्मिक स्थळे सद्भावना देतात…या प्रेरणा आणि सद्भभावनेवरच आपली समाजव्यवस्था, संस्कृती टिकून आहे. मात्र जेव्हा या ऐतिहासिक वास्तुंची एखादी चिरा निखळते तेव्हा मन अस्वस्थ होते. जे ऐतिहासिक आहे, ते स्वच्छ आणि सुंदर रहावे म्हणून अनेक युवक युवती, संघटना कार्यरत असतात. पण त्या कार्यतत्परतेला असंख्य हातांची गरज आज निर्माण झाली आहे. आपण धार्मिक स्थळी जातो तेव्हा आपल्या मनात एक श्रद्धा असते. या श्रद्धेपोटी आपण तिथे माथा टेकून आपले संकट, गार्‍हाणं मांडतो. हे करत असताना आपवाद वगळता अनेकांकडून तिथे अस्वच्छता होते. या अस्वच्छतेला स्वच्छतेची किनार द्यायची जबाबदारी कोणाची? हा सवालही उपस्थित होतो. हातात मोबाईल घेऊन सेल्फीसाठी धडपडणारी पिढी प्रत्येक गड, किल्ल्यांसह धार्मिक स्थळी दिसते, पण त्यांच्या हातातील मोबाईल खिशात जाऊन मोकळ्या हाताने कधी स्वच्छता केल्याचा फोटो फारसा दिसत नाही. एखाद्या दंगलीत, भांडणात दगड हातात घेणारे हात जेव्हा ऐतिहासिक वास्तूंच्या निसटत चाललेल्या चिरा सांभाळतील, तिथे स्वच्छता करतील तेव्हाच खर तर नव्या पिढीत संस्काराचे बिज रूजेल. पोलीस नेहमीच समाजातील खलनायक आणि खलप्रवृत्तीला पायबंद घालण्यासाठी कार्यरत असतात. मात्र *वारसा स्वच्छतेचा…मावळा छत्रपतींचा* असा उपक्रम राबवून पर्यटन विकास, गड किल्ल्यांचे जतन करण्याचा पायंडाही नव्या पिढीला घालून देतात. नव्या पिढीने यात स्वतःला झोकून देणे हा हा प्रवास खाच खळगे यांनी भरला असेल, मात्र युवाशक्ती मध्ये भविष्य बदलण्याची सामर्थ्य आहे. A journey of १००० miles starts with single step हा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला बळ देणारा असेल असे या प्रसंगाचे साक्षीदार म्हणून मला मोठे आशादायी किरण जाणवत होते. पोलीस अधिकारी येतात कर्तव्यभावनेने आपली सेवा बजावतात. ती बजावत असताना एखादा असा उपक्रम राबवतात की जो त्या परिसरात पिढ्यानपिढ्या जपला गेला पाहिजे. परिविक्षाधिन उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी एकविरा देवी गडावर राबवलेला उपक्रम हा एक स्वच्छतेची आणि माणुसकीची साखळी तयार करणारा उपक्रम आहे. ही साखळी भविष्यात वाढत जाईल…तेवढेच स्वच्छतेच्या यशाचे क्षितीज विस्तारत जाईल हा विश्वास वाटतो.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page