राजन लाखे यांच्या ‘बकुळगंध’ या ग्रंथाची डोंबिवली येथे समीक्षात्मक चर्चा


मावळ मराठा न्यूज़ पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : २४ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवड आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ निर्मित तसेच लेखक राजन लाखे संपादित शान्ता शेळके जन्मशताब्दी ग्रंथ ‘बकुळगंध’ यावर डोंबिवली येथे समीक्षात्मक चर्चा करण्यात आली. साहित्यसंपदा या संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर संतसाहित्याचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, ‘कुटुंब रंगलंय काव्यात’ फेम विसुभाऊ बापट, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी – चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, मसाप डोंबिवलीचे सुरेश देशपांडे, साहित्यिक रमेश धनावडे, वैभव धनावडे आदी उपस्थित होते.कार्यक्रमात शान्ताबाई शेळके यांच्यावर आधारित असलेल्या या ग्रंथचर्चेत वामनराव देशपांडे, विसुभाऊ बापट, सुरेश देशपांडे यांनी सहभाग घेतला. साहित्यविश्वात एका कवयित्रीवर, तिच्या साहित्यावर तसेच आठवणींवर अशा प्रकारचा ग्रंथ आजपर्यंत झाला नसल्याचे मत व्यक्त करून संदर्भग्रंथ म्हणून ‘बकुळगंध’ हा ग्रंथ मोलाची भूमिका बजावेल, असे भाकीत चर्चेच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी रमेश धनावडे यांनी राजन लाखे यांची मुलाखत घेऊन त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नांच्या माध्यमातून ग्रंथप्रक्रियेची निर्मिती, शान्ता शेळके यांचे साहित्य, त्यांच्या आठवणी रसिकांपर्यंत पोहचविल्या.गायक संतोष संकपाळ आणि गायिका रीचा राजन यांनी शान्ता शेळके यांची प्रसिद्ध गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. मुंबई आकाशवाणीच्या निवेदिका पूजा काळे यांनी सूत्रसंचालन केले. वैभव धनावडे यांनी आभार मानले.




