“प्रत्येकाला आपली ‘मन की बात’ मांडता आली पाहिजे!” – संजय आवटे

मावळ मराठा न्यूज़ :-पिंपरी (प्रदीप गांधलीकर ) दिनांक : २१ नोव्हेंबर २०२३ “बुद्धांचा असलेला देश आता निर्बुद्धांचा झाला आहे; आणि आपण सारे हतबुद्ध होऊन पाहत आहोत. प्रत्येकाला आपली ‘मन की बात’ मांडता आली पाहिजे अन् त्यासाठी साहित्यिकांनी भूमिका घेतलीच पाहिजे!” असे परखड विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत संजय आवटे यांनी ना. धों. महानोर साहित्यनगरी (जयगणेश बँक्वेट हॉल), नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी व्यक्त केले. इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित दोन दिवसीय दुसऱ्या इंद्रायणी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी संजय आवटे बोलत होते. संमेलनाध्यक्ष सोपान खुडे, शिवचरित्र अभ्यासक अनिल पवार, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, स्वागताध्यक्ष गणेश सस्ते, इंद्रायणी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, समन्वयक अरुण बोऱ्हाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.संजय आवटे पुढे म्हणाले की, “ज्ञानोबा अन् तुकोबा हे मराठीतील दोन सर्वश्रेष्ठ साहित्यिक आहेत. कविता ही खूप महत्त्वाची गोष्ट असते म्हणूनच ती इंद्रायणीमध्ये बुडवावी, असे मंबाजींना वाटले होते. तेच मंबाजी आता तुकोबांच्या वेषात देहूमध्ये आले होते. आपण संतसाहित्याचे बोट सोडले अन् तिथेच खूप मोठी गडबड झाली. वैविध्यपूर्णता ही भारताची खरी ओळख आहे अन् हीच ओळख जपण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे; अन्यथा येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. काळ आणि माध्यमं बदलली तरी आशय तोच आहे. महिलांची लक्षणीय संख्या आणि सोपान खुडे यांच्यासारखा अध्यक्ष हेच या संमेलनाचे मोठे यश आहे!” अनिल पवार यांनी शिवराज्याभिषेकावर लेखन करण्याची संधी मला मिळाली याचा मनापासून आनंद झाला, अशी भावना व्यक्त केली. विलास लांडे यांनी, “राजकारणापलीकडे जाऊन साहित्याविषयी बोलताना तोलून मापून बोलावे लागते!” असे मत मांडले. प्रकाश रोकडे यांनी, “इंद्रायणीच्या परिसरात ज्ञानेश्वर, तुकोबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवतेसाठी विद्रोह केला. त्याच नावाचे हे दूरदर्शी, पारदर्शी आणि बंधुतादर्शी साहित्य संमेलन आहे!” असे गौरवोद्गार काढले. अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून, “मोशी परिसरातील ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजावी म्हणून इंद्रायणी साहित्य परिषद प्रयत्नशील आहे. या परिसरातील भूमिपुत्रांना विधायक कार्यासाठी उत्तेजन मिळावे म्हणून त्यांना कृतज्ञतापूर्वक सन्मानित करीत आहेत!” अशी माहिती दिली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या भूमिपुत्रांना पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रा. विकास कंद, रामदास जैद, डॉ. सुहास कांबळे, जितेंद्र माळी, मोहन भोसले, सुनील तापकीर, नीलेश गावडे, नाजीम शेख, राजेश बोराटे, गोरख मोरे, सविता खराडे यांचा समावेश होता. पुरस्कारार्थींच्या वतीने नाजीम शेख यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले.‌ डॉ. सीमा काळभोर, रामभाऊ सासवडे, योगेश कोंढाळकर, अलंकार हिंगे, श्रीहरी तापकीर, डॉ. पौर्णिमा कोल्हे, दामोदर वहिले, प्रा. डॉ. नागनाथ बळते, सुनील सस्ते, हिरामण सस्ते, अशोक ढोकले, काळूराम सस्ते, गणेश सस्ते, माणिक सस्ते, महीपती साठे, संतोष बारणे, दादाभाऊ गावडे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप तापकीर यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page