“बालसाहित्यातून मुलांचे भावविश्व साकार व्हायला हवे!” – एकनाथ आव्हाड

मावळ मराठा न्युज :-पिंपरी, (प्रदीप गांधलीकर)दिनांक : २२ एप्रिल २०२४) “बालसाहित्यातून मुलांचे भावविश्व साकार व्हायला हवे!” असे मत साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारविजेते साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात रश्मी गुजराथी आणि सीमा गांधी यांनी मुलाखतीच्या माध्यमातून एकनाथ आव्हाड यांच्याशी सुसंवाद साधला. ज्येष्ठ साहित्यिक विनीता ऐनापुरे अध्यक्षस्थानी होत्या.शिक्षकी पेशातील एकनाथ आव्हाड यांचा सविता पटेकर नावाच्या विद्यार्थिनीवर लिहिलेली पहिली कविता ते दिल्ली येथील भारत सरकाराच्या साहित्य अकादमीच्या बालसाहित्यातील पुरस्कारापर्यंतचा ‘दापूर ते दिल्ली’ हा लेखनप्रवास सुसंवादाच्या माध्यमातून उलगडत गेला. विद्यार्थी मित्रांना समोर ठेवून अभ्यासाला पूरक अशा बालसाहित्याची निर्मिती करणारा, भाषिक प्रगल्भता वृद्धिंगत करणारा, कथाकथन कार्यशाळेतून शिक्षकांना मार्गदर्शन करणारा, आईच्या आठवणीत हळवा होणारा आणि हिंदी, इंग्रजी तसेच ब्रेल लिपीत ज्याचे साहित्य पोहोचले आहे असा संवेदनशील शिक्षक, प्रथितयश लेखक, उत्तम मार्गदर्शक आणि भावनाप्रधान माणूस अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या बहुविध पैलूंची श्रोत्यांना प्रश्नोत्तरांतून अनुभूती मिळाली. अस्मानी गुजराथी या चिमुरडीसह रसिकांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देऊन आव्हाड यांनी उपस्थितांची मने जिंकली.”मुलांनी लिहिते ठेवल्यामुळेच मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला!” अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.याप्रसंगी बालचमूंची गाणी या सत्रात चिमुकल्या मुलांनी सादरीकरण केले. राजन लाखे लिखित ‘ढब्बू ढेरपोट्या’ आणि एकनाथ आव्हाड लिखित ‘छंद देई आनंद’ या बालकवितासंग्रहातील गीतांचे ऋचा गांगल आणि समूहाने सादरीकरण केले. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रजनी सेठ, किरण लाखे, रवींद्र गुजराथी, रोहित गुजराथी, जयश्री श्रीखंडे यांनी संयोजनात सहकार्य केले. डॉ. दिलीप गरुड यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page