कौशल्य रोजगार सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार -डॉ. नीलम

गोऱ्हे मावळ मराठा न्युज :-मुंबई, दि.८: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली इर्शाळवाडीमधील लोकांना पायाभूत सुविधा नव्याने उभारण्यात आलेल्या आहेत. इथे वीज, पाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. नागरिक नेहमीप्रमाणे रोजगारासाठी बाहेर जात आहेत. इथलं जनजीवन पूर्वपदावर आलेलं आहे. येथील ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचे आभार मानले असल्याचे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ. गोऱ्हे यांनी आज इर्शाळवाडीला भेट देत येथील ग्रामस्थांची विचारपूस केली. याप्रसंगी, शिवसेना उपनेत्या शिल्पा देशमुख, सरपंच रितूताई ठोंबरे , सुरेखा शितोळे यांसह शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी, आदिवासी बांधव उपस्थित होते. यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी येथे भूस्खलनाची घटना बुधवारी १९ जुलै २०२३ रोजी रात्री उशीरा घडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहत बचावकार्य केले होते. शासन स्तरावरून देखील त्यांनी तत्परतेने योग्य ती मदत येथील लोकांना उपलब्ध करून दिली होती. येथील नागरिकांचे जीवन पूर्वपदावर आलेले असले तरी काही गोष्टींची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्याकरिता आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून नागरिकांना आवश्यक त्या सोईसुविधा देणेबाबत प्रयत्न करण्यात येतील. घरांचे बांधकाम वेगाने चालु असुन तसेच सर्व मुला व मुलींना कौशल्य रोजगार सारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. शेतीचे काही प्रश्न आहेत त्यामध्ये लक्ष घालून सोडविण्यात येत आहे असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page