आळंदीत मतदानाचा उत्साह ; मतदारांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत,वडगावकरांच्या तीन पिढ्यानी केले मतदान

मावळ मराठा न्युज :-आळंदी,(अर्जुन मेदनकर) खेड आळंदी विधानसभेच्या निवडणुकी निमित्त सार्वत्रिक मतदान दिनी आळंदी नगरपरिषदेच्या वतीने मतदारांसाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. १८ वय वर्षावरील नवमतदारांसह वयोवृद्ध जेष्ठ नागरिक महिला, पुरुष, दिव्यांग बांधव यांनी देखील मतदान करीत लोकशाहीच उत्सवात आपला सहभाग दाखविला. आळंदी शहरातील ९ प्रभागातील मतदानासाठी २४ मतदान केंद्र तैनात करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर मतदारांचे सोयीसाठी व्हील चेअर, दिव्यांग बांधवांसाठी एक हात मदतीचा या न्यायाने कर्मचाऱ्यांची नियुक्ती सेवाभावी वृत्ती जोपासत करण्यात आली होती. दिव्यांगांसाठी ये जा करण्यास रॅम ची देखील व्यवस्था होती. पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी मंडप व्यवस्था दक्षता घेत करण्यात आली होती. येथील एमआयटी कॉलेज मतदान केंद्र आदर्श आणि लक्षवेधी ठरले. आळंदीत मतदान केल्या नंतर स्वाक्षरी फलक व्यवस्था असल्याने मीराताई भोसले यांचेसह अनेक महिलांसह पुरुष मतदारांनी आपली स्वाक्षरी करीत सेवांचा लाभ घेतला.आळंदीतील मतदान केंद्रावर आजोबांनी मुलासह नातवाचे उपस्थितीत वडील, मुलगा आणि नातू अशा तीन पिढ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यात आळंदी नगरपरिषद माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद वडगावकर यांचा समावेश होता. आळंदी नगरपरिषद हद्दीतील ( आळंदी खेड ) मधील मतदार यांना जवळ असलेल्या ठिकाणी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये श्री ज्ञानेश्वर विद्यालय येथे सात केंद्र तसेच श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर येथे तीन केंद्र आणि आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक मध्ये चार मतदान केंद्र होते. तसेच श्रीमती लक्ष्मीबाई विठ्ठलराव दुराफे विद्यालयातील तीन मतदान केंद्र येथे मतदारांच्या सोयीसाठी कार्यरत होते. एमआयटी कॉलेज ( आळंदी हवेली ) मधील भागातील नागरिकांच्या सोयीसाठी सात मतदार केंद्र उभारण्यात आले होते. आळंदीत २४ ठिकाणी मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळ पासून मतदारांनी रांगा लावून मतदान केले. यावेळी मतदारांनी सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेत इतर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करीत निवडणूक आयोगाचे निर्देशांचे पालन करीत मतदान करून लोकशाही उत्सवात मतदान करून आपला हक्क बजावण्याचे युवक, तरुण, वयोवृद्ध महिला, पुरुष मतदारांनी आवाहन करीत मतदान केले. सकाळी सात वाजता मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या चार तासांमध्ये सुमारे १६.४० टक्के मतदान खेड आळंदी विधानसभा मतदार संघात उत्साहात मतदान पार पडले. यावेळी सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी खेळीमेळीचे वातावरणात मतदान प्रक्रिया पार पाडली. आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात सेवा सुविधा मतदारांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यामध्ये मंडप, पिण्याचे पाणी,दिव्यांग मतदारांचे सोयीसाठी व्हिलचेअर, सेवक, दिव्यांग मतदारांसाठी वाहन व्यवस्था देखील करण्यात आली होती. अशी माहिती अभियंता सचिन गायकवाड, अर्जुन घोडे यांनी दिली. मतदान काळात शांतता कायदा सुव्यवस्था, पोलीस बंदोबस्तासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, बापूसाहेब ढेरे, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, आळंदी मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, आदींनी काम पाहिले. श्री ज्ञानेश्वर विद्यालयासह आळंदीतील विविध मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावून मतदान करीत लोकशाहीचे उत्सवात आपला सहभाग उत्साहात नोंदविला.मतदारांनी मी मतदान केले. तुम्ही सुद्धा मतदान करा. मतदान हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे मतदान केलंच पाहिजे. असे सांगत इतरांना मतदान करण्याचे मतदान केंद्रातून मतदान करून बाहेर आल्या नंतर आवाहन केले. मतदान करून हातावरची शाई दाखवून वार्षिक शुल्कावर ५० टक्के सवलत यूनिकवे जिमचे प्रशांत घुंडरे पाटील यांनी मतदान दिनी नाव नोंदणी करणाऱ्या नागरिकांसाठी सुरु ठेवली होती. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघांमध्ये दुपारी एक वाजेपर्यंत संपूर्ण खेड तालुक्यामध्ये 32 टक्के मतदान झाले आहे. आळंदी शहरातील विविध मतदान केंद्रात हिरकणी कक्ष देखील विकसित करून दक्षता घेण्यात आली होती. पुणे जिल्ह्यामध्ये दुपारी एक वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान झाले होते. गुलाब पुष्प देऊन देऊन आळंदीतील एमआयटी कॉलेजमध्ये मतदारांचे स्वागत करून लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्राच्या विधानसभे साठी लोकशाहीचा उत्सव मतदारांनी मतदान करीत उत्साहात संपन्न केला. सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया वेळ संपल्याने मतदान केंद्रात प्रवेश देणे बंद करण्यात आले. या लोकशाहीचे उत्सवात मतदान करण्याचे भाग्य लाभले. लोकशाही जिंदाबाद असे अनेक मतदारांनी सांगितले. सोळू मध्ये ६० टक्के म्हणजेच १ हजार ४८१ मतदान झाले. तसेच येथील मरकळ गावातील ४ हजार ९५० मतदारांपैकी ३ हजार ६९९ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांमध्ये निरुत्साह जाणवला. सुरुवातीला रांगा लावून मतदान झाले. दुपारी काहीशी गर्दी मंदावली तर चार नंतर पुन्हा मतदान केंद्रात गर्दी वाढली. मतदान प्रक्रिये दरम्यान महायुतीचे उमेदवार व आमदार दिलीप मोहिते पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे, वंचितच उमेदवार रवींद्र रंधवे आदी उमेदवारांनी मतदान केंद्रावर बूथ वर भेट देत संवाद साधला. आळंदी एमआयटी मतदान केंद्रात ७ हजार ८५२ पैकी ४ हजार २१२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page