बरोबर ना! आमदार होण्याअगोदर सामान्य जनतेचा आणि आमदार झाल्यावर मात्र पक्ष कार्यकर्त्यांचा कसा होतो ?


मावळ मराठा न्यूज :- लोणावळा,हे खरे असते का? आमदार होण्याअगोदर सामान्य जनतेचा आमदार असे म्हटले जाते आणि आमदार झाल्यावर मात्र पक्ष कार्यकर्त्यांचाच आमदार कसा होतो? हे सामान्य नागरिकांना पडलेले कोडे आहे. आमदार होण्याअगोदर आमदार सुनील शेळके यांचा ग्रामीण भागातील जनसंपर्क दांडगा होता,कोणत्याही भागात म्हणजे अंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ,वडगाव मावळ, देहू गावातील कोणत्याही खेडेगावात त्यांचा सामान्य नागरिक यांचेशी थेट संपर्क होता,तो आता या चार वर्षात खूप कमी होताना दिसत आहे. आमदार झाल्यानंतर तर तब्बल दोन वर्षांनी लोणावळा नगरपरिषदेत आढावा बैठक घेतली होती.आमदार हा झाल्यानंतर कोणत्या पक्षाचा राहत नाही तो पूर्ण मतदार संघाचा म्हणजे संपूर्ण तालुक्याचा होतो. आमदार होण्याआधी आम्ही देखील त्यांच्या निवडणुक प्रचारात कौतुक केले होते. सर्व सामान्यांचा,ग्रामस्थांच्या समस्या,अडचणीत नेहमी तत्पर असणारा जन सेवक म्हणून आमदार हवा असेल तर सुनील अण्णाच. निवडणुकी आधीच्या १५,२० दिवसाच्या मावळ नागरिकच्या फेस बुक पोस्ट त्यांनी पाहिल्या असतील तर त्यांना नक्कीच कळेल. थेट जनतेशी नाळ असणाऱ्या सुनील शेळके आमदार झाल्यावर फक्त पक्ष कार्यकर्ता यांचा कधी होतो हे बहुतेक त्यांना ही कळत असून त्यांच्या आजू बाजूला असणारे कळू देत नसतील. हे मावळ चे दुर्दैव म्हणावे लागेल. हे सर्वानाच प्रकर्षाने जाणवते. परंतु बोलण्याची हिम्मत कोणी करत नसेल म्हणून आम्ही त्यांना पत्रकार म्हणून सल्ला देतो .तुमचे गेल्या चार वर्षांतील कार्य उत्तमच आहे.कोट्यवधीचा निधी आणि बरीच प्रलंबित कामे मार्गी लावली त्याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. परंतु जनतेशी असलेली नाळ तुटू देवू नये एवढेच. रुपलेखा ढोरे असतील स्वर्गीय दिंगबर दादा भेगडे असतील त्यांनी आपल्या राज्यात त्यावेळी विरोधी सरकार असताना, पुरेसा निधी मिळत नसताना जनतेची नाळ कधीच तुटू दिली नाही. ते फक्त आपल्या कार्यकर्त्याच्या मयती ला किंवा दुःखात सहभागी व्ह्यायचे नाहीत.तर सामान्य जनतेच्या दुःखात नेहमी पुढे असायचे. आणि हयाच संपर्कच्या जोरावर त्यांनी दुसऱ्यांदा आमदारकी मिळवली.त्यात त्यावेळी राष्ट्रवादीतील काही प्रमाणात अंतर्गत भांडणे ही जबाबदार असतील पण सगळ्यांशी सतत संपर्कात राहणारे दिगंबर दादा होते. त्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्या सोबतच सामान्य नागरिक यांचेशी नाळ जोडणे गरजेचे आहे.माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी यांच्या १० वर्षाच्या कार्यकाळातील पहिल्या काही वर्षात निधी पुरेसा नाही मिळाला परंतु नंतर मात्र सत्ता आल्यावर मात्र त्यांनी तालुक्याचा विकासात मोठा बॅकलॉग भरून काढून चांगला तालुक्याचा विकास केला. आम्ही आमच्या पत्रकार काळातील २३ वर्षे सामान्य जनतेशी जोडलेलो आहोत. आम्ही देखील थेट जनतेशी थेट संवाद, भेट,अडीअडचणी आमच्या परीने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. तुम्हाला पुन्हा जनतेशी कनेक्ट व्हावे लागेल. ग्रामीण भागात कडक उन्हाळ्यात पाण्याची खूप बिकट परिस्थिती आहे. मावळात एवढे धरणे असून देखील वाड्या वस्त्यांवर पाण्याचे विदारक चित्र आहे. त्यांनी ते पाहावे. मावळातील असे अनेक खेडी आहेत जिकडे अजून धड रस्ता नाही, वीज नाही पाणी नाही मैल मैलवरून पाणी साठी आया बहिणीना भटकंती करावी लागते. मावळ चे आमदार सुनील शेळके यांनी पुन्हा जनतेशी संपर्क वाढवावा.




