“मधमाशीच्या सहजतेने कर संकलित व्हावा!”जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प पहिले

मावळ मराठा न्यूज;-पिंपरी (प्रदीपगांधलीकर) दिनांक : २७ एप्रिल २०२३ “फुलांमधून ज्या सहजतेने मधमाशी मध शोषून घेते त्याच सहजतेने कर संकलित व्हावा!” अशी अपेक्षा ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. नितीन शहा यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवड येथे बुधवार, दिनांक २७ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केली. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘जी. एस. टी. सर्वसामान्यांच्या चष्म्यातून’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना ॲड. नितीन शहा बोलत होते.‌ साहाय्यक कर आयुक्त ॲड. सुनील काशीद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रवीण बारणे, गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. स्वर्गीय भालचंद्र विठोबा बारणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे व्याख्यानपुष्प प्रायोजित करण्यात आले होते.दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. महेश गावडे यांनी प्रास्ताविकातून गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या बत्तीस वर्षांच्या कालावधीतील उपक्रमांची माहिती दिली. “वस्तू आणि सेवा कर (जी. एस. टी.) याविषयी नागरिकांच्या मनात अनेक शंका आणि भीती आहे म्हणूनच या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे!” अशी भूमिका राजाभाऊ गोलांडे यांनी मांडली. ॲड. सुनील काशीद यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून एका मार्मिक कथेच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा कर कार्यप्रणालीची माहिती मिस्कील शैलीतून करून दिली.ॲड. नितीन शहा पुढे म्हणाले की, “आपल्या देशात राज्य विक्रीकर, केंद्रीय विक्रीकर, अबकारी कर, राज्य प्रवेश कर, जकात अशा विविध करांचे जाळे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांचा आकारणी दर यांमध्ये विविधता होती. त्यामध्ये सुटसुटीतपणा आणि एकसूत्रता यावी म्हणून ०१ जुलै २०१७ पासून संपूर्ण देशात वस्तू सेवा कर कार्यप्रणाली कायदा अंमलात आला. त्यासाठी संगणकीय प्रणाली विकसित केली गेली. तीन दिवसांच्या आत नोंदणी करून कोणत्याही व्यावसायिकाला देशातील कोणत्याही भागात व्यवसाय करण्याची सुविधा त्यामुळे उपलब्ध झाली. वस्तू सेवा कर प्रणालीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर कराची रक्कम संकलित होत असल्याने विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध होऊ लागला आहे. असे फायदे असले तरी वस्तू सेवा कर प्रणाली कार्यान्वित होऊन पाच वर्षे झाली तरी कर आकारणी करण्यासाठी वस्तूंचे वर्गीकरण आणि त्यावरील कराची टक्केवारी याविषयी क्लिष्टता, संदिग्धता आहे. या पाच वर्षांच्या कालावधीत १९१ परिपत्रके, ४०३ अधिसूचना, १५२ वेळा कर आकारणी कोष्टकांमधील बदल यामुळे करसल्लागार, अर्थतज्ज्ञ यांचाही गोंधळ उडत असल्याने व्यावसायिकांची अवस्था अधिकच निर्नायकी झाली आहे. त्यातून चुका होण्याची शक्यता वाढली आहे; परंतु ही प्रणाली संगणकीकृत असल्याने निर्धारित वेळेत कर भरला गेला नाही तर दंड आणि आर्थिक नुकसान होण्याची भीतीही व्यावसायिकांच्या मनात निर्माण झाली आहे. १४२ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात एक कोटी वीस लाख नोंदणीकृत व्यावसायिक आहेत. नोंदणीकृत व्यावसायिकांची संख्या वाढवणे, कर आकारणीत होणाऱ्या चुका दुरुस्त करण्याची सुविधा निर्माण करणे, कायद्याचे काटेकोर पालन करणे अशा काही गोष्टींमुळे प्रामाणिक व्यावसायिकांना दिलासा मिळू शकेल!” असे मत ॲड. नितीन शहा यांनी व्यक्त केले. किचकट आणि रूक्ष विषय असूनही सुलभ अन् सोप्या पद्धतीने विविध उदाहरणे देत त्यांनी मांडणी केल्याने श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून श्रोत्यांचे शंका समाधान करण्यात आले.गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. ब. हि. चिंचवडे यांनी सूत्रसंचालन केले. धीरज गुत्ते यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page