व्याख्यानमाला – पुष्प पहिलेसुसंवाद ही आनंदी जीवनाची गुरूकिल्ली होय- अशोक देशमुख

मावळ मराठा न्यूज,पिंपरी (प्रदीप गांधलीकरदिनांक : १२ मे २०२३ “सुसंवाद ही आनंदी जीवनाची गुरूकिल्ली होय!” असे प्रतिपादन ज्येष्ठ समुपदेशक अशोक देशमुख यांनी श्री दत्त मंदिर चौक, मोहननगर, चिंचवड येथे गुरुवार, दिनांक ११ मे २०२३ रोजी केले. जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनाची गुरूकिल्ली!’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना अशोक देशमुख बोलत होते. कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच अंबादास चौधरी, जय भवानी तरुण मंडळाचे संस्थापक – अध्यक्ष मारुती भापकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अशोक देशमुख पुढे म्हणाले की, “आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीला ताणतणावाचा सामना करावा लागतो. तणावाचा सर्वोच्च बिंदू अडीच मिनिटांचा असतो. या काळात काही वेळा ती व्यक्ती आत्महत्या करायला प्रवृत्त होते. त्यामुळे जीवनात संवादाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. सुसंवादाने तर अनेक ताणतणाव मोकळे होतात. यासोबतच दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा. दररोज किमान अर्धा तास पायी चाला. भावी काळात श्वासासंदर्भातील अनेक विकारांचे प्रादुर्भाव वाढणार आहेत.‌ त्यामुळे श्वासाचे व्यायाम करा. नियमितपणे योगासने करा. सर्वसाधारणपणे माणूस वयाच्या ५८ वर्षांनंतर निवृत्त होतो. भारतीय माणसाचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर पैसाच तुम्हाला सन्मानाने जगवेल म्हणून पैशाला कमी लेखू नका.‌ आपल्या कुवतीनुसार दान करण्याची वृत्ती ठेवा. दिवसभरात ज्यांनी तुम्हाला मनस्ताप दिला असेल त्यांना रात्री झोपण्यापूर्वी क्षमा करा; आणि शांतपणे किमान सात तास झोप घ्या.‌ आपले शरीर हे एक प्रकारचे वाद्य आहे. त्यामुळे शरीरातील ताल अन् सूर यांचे संतुलन राखा.‌ स्वतःलाही विसरून जाण्याची किमया हास्यात असते म्हणून संधी मिळेल तेव्हा मनमुरादपणे हसा. जेव्हा दैनंदिन गोष्टींमध्ये स्वारस्य वाटेनासे होते; तेव्हा सहकुटुंब सहलीला जा. अशा वेळी नेहमीपेक्षा वेगळे कपडे परिधान करा. नेहमीच्या वातावरणापासून दूर जा.‌ विनोद मनाला प्रसन्न ठेवण्याचे काम करतो म्हणून स्वतः विनोद करा आणि दुसऱ्याच्या विनोदाला दाद द्या. ज्यावेळी ताणतणाव निर्माण होतील तेव्हा समुपदेशन घ्या.‌ आपल्या जीवनातील समस्या आपणच सोडवायच्या असतात म्हणून त्यांना निर्भयतेने सामोरे जा आणि पुन्हा जीवनाचा आनंद घ्या!” विनोदी किस्से, सुलभतेने करता येणारी व्यायामाची प्रात्यक्षिके सादर करीत अशोक देशमुख यांनी श्रोत्यांशी संवाद साधला.दीपप्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून व्याख्यानमालेचा प्रारंभ करण्यात आला. काशिनाथ नखाते यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “प्रबोधनातून विचारांना दिशा मिळते!” असे मत व्यक्त केले. मुख्य संयोजक मारुती भापकर यांनी प्रास्ताविकातून, “राजकीय उलथापालथीचे सामान्य माणसांच्या जीवनावर दूरगामी परिणाम होतात. त्यामुळे व्याख्यानमालेच्या माध्यमातून वस्तुस्थितीचे दिशादर्शन व्हावे या उद्देशाने हे प्रबोधनपर्व आयोजित केले आहे!” अशी भूमिका मांडली. जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मयूर जयस्वाल यांनी आभार मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page