व्यसनांपासून दूर रहा – आय पी एस,सत्य साई कार्तिक



मावळ मराठा न्युज :-लोणावळा : पालकांनी मुलांवर करीयरच्या बाबतीत बंधने घालू नये. मुलांना मोकळ्या वातावरणाची आणि सकारात्मक विचारांची गरज आहे. मुलांनी महाविद्यालयीन जीवनातच आपले ध्येय ठरवावे व त्यानुसार आपली वाटचाल करावी. महाविद्यालय हे आपल्या कलागुणांना वाव देणारे केंद्र आहे. महाविद्यालयाच्या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे गरजेचे आहे. यातूनच तुमचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाची वाढ होत असते. महाविद्यालयीन जीवनात चुकीच्या संगतीने चुकीचे कामे आणि व्यसनाधीनतेला बळी पडू नका. असे आवाहन ग्रामीण पोलीस उपाअधीक्षक सत्य साई कार्तिक यांनी केले. निमित्त होते लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे, एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय लोणावळातर्फे वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसा बागल, संस्थेचे उपाध्यक्ष मा. दत्तात्रय पाळेकर, सचिव मा. नीलिमा खिरे, खजिनदार दत्तात्रय येवले, मा. नंदकुमार वाळंज, शैलजा फासे, उपसचिव मा. अजय भोईर, डॉ. दिगंबर दरेकर, माजी नगरसेवक संजय गायकवाड, आद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष देवराम लोखंडे, मुस्लीम सहकारी बँकेचे संचालक जाखीर खलिफा, प्राचार्य नरेंद्र देशमुख, स्नेहसंमेलन प्रमुख अँनी वर्गीस, उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, कैवल्यधामचे प्रतिभा राजभोज,देवल चव्हाण तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रध्यापकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी तसेच लोणावळा शहरातील नागरिक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मोनालिसा बागल याप्रसंगी म्हणाल्या, मी या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. याचा मला अभिमान आहे. मी तुमच्यातून इथपर्यंत आले आहे. या महाविद्यालयाने मला खूप सहकार्य केले आहे. मी नऊ वर्षांची असताना बाबा गेले त्यानंतर महाविद्यालयात शिकत असताना आई गेली तेव्हा मला माझ्या आईची उणीव या महाविद्यालयाने कधीही जाणवू दिली नाही. चित्रपट क्षेत्रात मला करियर करायचे हे माझे ठाम मत असल्याने मी इतर क्षेत्राकडे कधीही गेले नाही. मी माझ्या चित्रपट क्षेत्राकडे संपूर्ण लक्ष दिल्यामुळे आजपर्यंतचा यशस्वी प्रवास केला आहे. महाविद्यालय हे प्रेरणा देणारे केंद्र आहे. याचा सर्वांनी आपल्या आयुष्यात उपयोग करून घेणे गरजेचे आहे. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.दतात्रय पाळेकर यानी मनोगतात सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त काव्यवाचन, वादविवाद, निबंधलेखन, रांगोळी, पाककला, चित्रकला, मेहंदी, रँप वाक इत्यादी स्पर्धांचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन प्रा. भक्ती अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. महाविद्यालयात मागील वर्षात डॉ. रंजुबाला चोप्रा, डॉ. मल्हारी नागतिलक यांना पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. धनराज पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. वर्षभर घेण्यात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या पारितोषिक वितरणाचे सुत्रसंचालन प्रा. दीपक तारे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. अमर काटकर व धनश्री पाध्ये यांनी केली. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी केले.वार्षिक अहवालाचे वाचन प्रा.ॲनी वर्गिस यानी केले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ आपटे आणि प्रा. संजय साळुंखे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा. भक्ती अहेर यांनी केले.




