वृद्धाश्रम ओस पडतील तेव्हा भारतीय संस्कृती जगात महान – अविनाश भारती

मावळ मराठा न्यूज,पिंपरी:-(प्रतिनिधी) आधुनिक काळात जीन्स घालून कॉलेजला जावून आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणे हि गरज आहे. तर वाढत्या वृद्धाश्रमामुळे लयाला चाललेली संस्कृती जपणे हे आपले कर्तव्य आहे.जेव्हा वृद्धाश्रम ओस पडतील तेव्हा आपली भारतीय संस्कृती जगात महान होईल.असे मत युवा व्याख्याते अविनाश भारती यांनी चिखली येथे व्यक्त केले.चिखली शरद नगर येथील स्वामी विवेकानंद लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत त्यांनी “भारतीय संस्कृती आणि आजचा तरुण” या विषयावर दुसरे पुष्प गुंफले.यावेळी माजी महापौर मंगला कदम,सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप,सावरकर मंडळाचे भास्कर रिकामे,कवी श्याम कुंभार,पोपट हजारे,संदीप थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामराजे बेंबडे आदी मान्यवर उपस्थित होते.श्री. भारती पुढे म्हणाले कि,आपल्या संस्कृतीमध्ये मातृपितृ देवो भव आणि लहानांनी थोर- मोठ्याना आदर देण्याची पद्धत आहे.मात्र आज जरा चित्र बदलताना दिसत आहे.आजची तरुण पिढी तर नम्र नव्हे नंबरी झालेली पहायला मिळत आहे.पूर्वी आचार्यदेवो भव ची अनुभुती येत होती.विद्यार्थ्यांच्या शाळेत गुरुजींचा मार हा जीवनाला वळण लावतो. पण आता तो पालकच शाळेत जावून गुरुजींना सांगतात कि आमच्या मुलाला हात लावू नका. पोरगा शिकला नाही तरी चालेल.शिक्षणामध्ये मोठी ताकद आहे.आपली संस्कृती हि अद्वैत तत्वावर टिकून आहे.वर्तमानकाळात कुणीच कुणाबद्दल आदराने बोलत नाही हे या संस्कृतीचे दुखणे आहे. महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो तेव्हा तेथील मंडळी तरुणांवर भाष्य करण्याचा आग्रह माझ्याकडे धरतात.हि चिंतेची बाब आहे.तेजस्विता, तपस्वीता, आणि तत्परता ज्यांच्या अंगी तो खरा तरुण.इथे वयाचा काहीहि संबंध नाही.स्वामीजी आणि थोर शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलाम यांनी तरुणांच्या जोरावरच परिवर्तन होईल असा अंदाज बांधला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पोतदार यांनी केले तर राजेश चिट्टे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैजनाथ गुळवे, मोहन सावरे, राजेंद्र साठे, महेंद्र माकोड़े, हंबीरराव भिसे ,पंडित मदने यांनी विशेष परिश्रम घेतले.




