“संस्कृती संवर्धनाच्या कार्यात मराठीजनांनी पाठीशी उभे राहावे!” – रूपाजी गणू

मावळ मराठा न्यूज़ :- पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ०२ ऑक्टोबर २०२३ “सुमारे चार पिढ्यांपासून मॉरिशस येथे स्थलांतरित झालेला मराठी समाज सणसमारंभांच्या माध्यमातून आपली मराठी संस्कृती जोपासण्याचा आणि वृद्धिंगत करण्याचा सातत्याने प्रयत्न करतो आहे. आपल्याकडील पुस्तके आणि मानसिक बळ देऊन आमच्या पाठीशी उभे राहावे!” असे आवाहन रूपाजी गणू यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी केले. कलारंजन प्रतिष्ठान, नवी सांगवी या संस्थेच्या वतीने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते रूपाजी गणू यांना मॉरिशस मधील मराठी भाषा व संस्कृती संवर्धनाच्या कार्यासाठी तेथील मराठी मंडळीचे प्रतिनिधी म्हणून संस्कृती संवर्धन पुरस्कार प्रदान करून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कासारवाडी येथील श्री दत्तमंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त शिवानंद स्वामी महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच उद्योजक विजय जगताप आणि कलारंजनचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, माजी नगरसेवक सुरेश भोईर, जयंत उर्फ अप्पा बागल, ह. भ. प. रामदास साखरे, भारत केसरी विजय गावडे,ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक, अशोक गोरे, पंकज पाटील, तानाजी एकोंडे, नीलेश शेंबेकर, पूनम गुजर, आत्माराम हारे, फुलवती जगताप, मुरलीधर दळवी, तसेच गणेश गावडे आदी मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.रूपाजी गणू यांनी उपस्थितांशी मुक्तसंवाद साधून मॉरिशसच्या भौगोलिक, सांस्कृतिक, धार्मिक स्थित्यंतरांमध्ये मूळच्या मराठी माणसांनी कला-संस्कृती संवर्धनासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देताना, “१८५० सालापासून मजूर म्हणून त्या बेटावर आलेल्या महाराष्ट्रातील माणसांनी आपली संस्कृती विसरली नाही. याउलट साहित्य, नाट्य, संगीत या कलाविष्कारांच्या माध्यमातून मराठी संस्कृतीची पताका तिथे डौलाने फडकत आहे. भारतातून अन् विशेषतः महाराष्ट्रातून कोणीही पर्यटक आल्यावर त्याचे आपुलकीने स्वागत केले जाते. आर्थिकदृष्ट्या आम्ही सुस्थितीत असलो तरी आमची कला, साहित्य, संस्कृतीची भूक शमविण्यासाठी सांस्कृतिक गोष्टींचे आदानप्रदान करून महाराष्ट्र – मॉरिशस हे ऋणानुबंध अजून दृढ करूया!” अशी भावनिक साद घातली. गिरीश प्रभुणे यांनी आपल्या मनोगतातून, “रूपाजी गणू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात अथक प्रयत्नातून मॉरिशस येथे भारताबाहेरील भारत उभा केला आहे!” असे गौरवोद्गार काढले. शिवानंद स्वामी महाराज यांनी अध्यक्षीय मनोगतातून छत्रपती शिवाजीमहाराज, मराठी संस्कृती, धार्मिक परंपरा याबाबत मॉरिशसच्या भूमीत कार्यरत असलेली चळवळ पाहता तेथे साहित्य संमेलन घेण्यात यावे, असे मत मांडले. याप्रसंगी आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिकदिनाचे औचित्य साधून नंदकुमार मुरडे, शोभा जोशी आणि अश्विनी रानडे या साहित्यिकांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकात मॉरिशस भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. तिथल्या मराठी संस्कृतीविषयी माहिती दिली. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश कंक यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page