‘नारीशक्ती दिना’ला अतिदुर्गम आदिवासी भागातील बहुसंख्य महिलांचाही मोठा प्रतिसाद

मावळ मराठा न्यूज:-पिंपरी (प्रदीप गांधलीकर)दिनांक : ३० जानेवारी २०२३ अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाशी संलग्न असलेल्या जनजाती कल्याण आश्रम आयोजित ‘नारीशक्ती दिना’ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेष बाब म्हणजे अतिदुर्गम आदिवासी भागातील बहुसंख्य महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान सेनानी पद्मभूषण राणीमाँ गाइदिन्ल्यू यांच्या जयंतीनिमित्त खानदेश मराठा मंडळ, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापारेषण अधीक्षक अभियंता ज्योती चिमटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या; तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला इदे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉ. मंगल सुपे यांची प्रमुख पाहुण्या म्हणून व्यासपीठावर उपस्थिती होती. जनजाती कल्याण आश्रम उपाध्यक्ष अंजली चिंचोलकर यांनी प्रास्ताविकातून आश्रमाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. प्रमिला इदे यांनी आपल्या मनोगतातून, “प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत नारीशक्तीला महत्त्वाचे स्थान आहे. स्वातंत्र्य चळवळीत कारावास भोगलेल्या राणीमाँ गाइदिन्ल्यू यांनी धर्मांतर रोखून पूर्व भारतातील जनजाती समाजासाठी अलौकिक कार्य केले!” असे मत मांडले. डॉ. मंगल सुपे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी माहिती दिली; तर ज्योती चिमटे यांनी, “मी स्वतः जनजाती समाजातील एक महिला आहे याचा मला अभिमान वाटतो. महिलांनी ‘सुपर वूमन’ बनण्याचा अट्टाहास धरू नये!” अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी दुर्गम आदिवासी भागांत सामाजिक कार्य करणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले. प्रातिनिधिक मनोगतांच्या माध्यमातून सत्कारार्थींनी कृतज्ञता व्यक्त केली. शुभांगी कानेटकर, ज्योत्स्ना जाधव, अंजली गंधे, माधुरी मापारी, माणिक कुलकर्णी, प्रतिमा कुंडाजी, विदुला पेंडसे यांनी संयोजनात परिश्रम घेतले. अपर्णा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. शोभा जोशी यांनी आभार मानले. पूर्वांचलमधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page